

कोल्हापूर : मारामारी, खंडणी, हॉटेलमध्ये घुसून तोडफोडसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चिन्या-मन्या टोळीच्या म्होरक्यासह चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ही कारवाई केली. हद्दपारीस मंजुरी मिळाल्यानंतर इस्पुर्ली पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्ह्याबाहेर सोडले.
विजय ऊर्फ चिन्या गजानन चौगले, मनोज ऊर्फ मन्या तुकाराम पाटील, ओंकार कृष्णात जाधव, प्रमोद ऊर्फ हणमा बंडू पाटील (रा. गिरगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. चिन्या-मन्या टोळीने इस्पुर्लीसह, करवीर परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी, मारामारीसह अनेक गुन्हे केले आहेत. या टोळीवर ६ गुन्हे दाखल असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चौघांवर हद्दपारीचा प्रस्ताव इस्पुर्ली पोलिसांनी तयार केला होता. हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी या चौघांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिली. मात्र, या टोळीमुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा होऊन नागरिकांच्या जीवितास धोका असल्याचे सिद्ध झाले. यानंतर पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे चिन्या-मन्या टोळीस एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.