कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह अकृषक वर्गवारीतील 13 लाख 18 हजार 900 थकबाकीदारांकडे तब्बल 2 हजार 32 कोटी 62 लाख रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. दिवसात 27 हजार 618 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र या महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीज सेवा देणार्या व जनतेच्या मालकीच्?या महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे. अशावेळी महावितरणचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी वीज ग्राहकांनी चालू व थकीत वीज बिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे 7 लाख 11 हजार 625 (775 कोटी 66 लाख), सातारा 1 लाख 19 हजार 285 (215 कोटी 46 लाख), सोलापूर 1 लाख 90 हजार (614 कोटी 39 लाख), सांगली 1 लाख 44 हजार 265 (175 कोटी 36 लाख) आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 53 हजार 720 ग्राहकांकडे 251 कोटी 75 लाख रुपयांची थकबाकी आहे. दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात 18 हजार 448, सातारा जिल्हा 2517, सोलापूर 1958, कोल्हापूर 2896 आणि सांगली जिल्ह्यातील 1799 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.