कोल्हापूर जिल्ह्यात आज-उद्या रेड आणि ऑरेंज अॅलर्ट
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेले दोन दिवस धुवाँधार पाऊस पडत आहे यामुळे काही भागात रेड आणि ऑरेंज अॅलर्ट देण्यात आाल आहे. मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्यात बुधवार(दि. 21) व गुरुवार (दि. 22) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अॅलर्ट दिलेला आहे.
15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या कालावधीमध्ये अतिपाऊसमान (प्रतिदिन 70 ते 150 मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :
- राजन गवस यांच्या मुलांच्या नावे बनावट अकाऊंट; अनेक मुलींना फसविले
- वीज मंत्री निलेश काब्राल यांचेआव्हान दिल्लीच्या वीज मंत्र्यांनी स्वीकारले
विशेषत: जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे.
तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
अधिक वाचा :
- पुणे क्राईम : बबलू गवळी च्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला
- Pegasus Spyware software म्हणजे काय? पाळत ठेवता येते का?
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि दिवसभर भुरभुर पाऊस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.
त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या.
रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 131.44 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा- राधानगरी 4.64, तुळशी 2, वारणा 25.14, दूधगंगा 12.5, कासारी 1.92, कडवी 1.37, कुंभी 1.97, पाटगाव 2.55 असा पाणीसाठा आहे.
शहरात पावसाची रिपरिप
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणार्या पावसाने शहरात मंगळवारी दिवसभर हजेरी लावली.
पावसाने शहरातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सखल भागात पाणी साचले असून अनेक भागांना तळ्यांचे स्वरुप आले आहे.
भरपावसात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध भागात भरपावसात नागरिकांची वर्दळ होती.