

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे सावंतवाडी ते कुडाळ येणार्या कारने रस्ता क्रॉस करणार्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात साळगांव हायस्कूल मधील लवू उर्फ राज रवींद्र पेडणेकर (वय 16) हा विद्यार्थी जागीच मृत्यू पावला. तर रोशन रामा पेडणेकर (13) हा गंभीर जखमी तर सोहम संतोष परब (18, तिन्ही रा. साळगांव- नाईकवाडी) हा विद्यार्थी जखमी झाला आहे. मंगळवारी दुपारी 2.30 वा. च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी दोन तास वाहतूक रोखून धरली. माणगावकडे जाणारा मिडलकट बंद करणे, दोन्ही बाजूला रमलर स्ट्रिप बसवणे या अटीवर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले, त्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाली.
साळगांव हायस्कूलमध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम आटोपून दहावीमध्ये शिकणारा लवू उर्फ राज रवींद्र पेडणेकर, नववी मध्ये शिकधारा रोशन रामा पेडणेकर व बारावी मध्ये असलेला सोहम संतोष परब हे दुपारी 2.20 वा.च्या सुमारास आपल्या घरी प्लेजर दुुचाकीने जात होते. झाराप येथील मिडलकट क्रॉस करण्याच्या नादात ते रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना सावंतवाडी ते कुडाळ जाणार्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कार राज रमाकांत आचरेकर (रा. देवगड) हा चालवत होता. या धडकेमुळे लवू उर्फ राज पेडणेकर हा दहा फूट उंच उडाला व रस्त्यावर आदळला. यात त्यांच्या डोकीला गंभीर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरा मुलगा रोशन रामा पेडणेकर गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. तिसरा सवार सोहम संतोष परब जखमी झाला आहे,त्यांच्यावर सावंतवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात प्लेजर मोटारसायकलचा चक्काचूर झाला तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृत राज पेडणेकरचा मृतदेह रस्त्यावरुन उचलण्यास नकार दिला. त्यामुळे मृतदेह रस्त्यावर तासभर पडून होता. या दुर्दैवी अपघातास महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. कु. लवू याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता एक होता. लवूच्या अपघाती निधनाने आई-वडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
या दुर्दैवी घटनांमुळे संतप्त नागरिकांनी झाराप तिठा येथे जवळपास दोन तास महामार्ग रोखून धरला. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम घटनास्थळी दाखल झाले, त्याच दरम्यान तहसीलदार वीरसींग वसावे सुद्धा दाखल झाले, या दोन्ही अधिकार्यांना ग्रामस्थांना घेराव घातला. महामार्ग प्राधिकरणच्या अभियंता श्रीमती इंगवले व श्री. साळुंखे दाखल झाले, या दोन्ही अधिकार्यांना नागरिकांनी खडे बोल सुनावले. रुपेश कानडे, बबन बोभाटे, भास्कर परब, अनिकेत तेंडुलकर, राजू तेंडुलकर, संदीप राणे, प्रदीप तेंडुलकर, रवींद्र सामंत, शुभकंर मांजरेकर, पिठ्या हळदणकर, अमोल तेली, बंड्या मांजरेकर, संतोष डिचोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हायवेवरून माणगावकडे जाण्यासाठी व माणगाव वरुन कुडाळच्या दिशेने येण्यासाठी असलेला मिडलकट बंद करा, दोन्ही बाजूला हायवेवर रमलर स्ट्रिप बसवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी उपस्थित अधिकार्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संतप्त ग्रामस्थांना होकार देत तात्काळ मिडलकट मध्ये जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू केले व चर मारुन मिटलकट बंद केला.
या अपघातानंतर नागरिकांचा संताप वाढल्यामुळे पोलिसांनी कुमक वाढवली. सावंतवाडी व ओरोस येथून अतिरिक्त पोलिस कर्मचारी घटनास्थळी बोलवण्यात आले होती. त्यामुळे घटनास्थळी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस छावणीचे रूप आले होते.
या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हायवेच्या दोन्ही अधिकार्यांना वैभव नाईक व संदेश पारकर यांनी चांगलेच खडसावले, तुमच्या सारख्या बेजबाबदार अधिकार्यांमुळे या अशा दुर्दैवी घटना घडत आहेत ,या अशा घटनांमध्ये तुमची मुलं-बाळं असती तर तुम्हाला समजलं असतं, अशा शब्दांत त्यांनी अधिकार्यांना खडसावले.
लवूच्या अपघाती निधनाने पेडणेकर कुटुंबावर आभाळ कोसळलं. एकुलता एक मुलगा, वडीलांचं आधारवड आणि आईचं सर्वस्व, अशा या लाडाच्या मुलाचा मृत्यूने काळीज हेलावून गेला. संध्याकाळी उशिरा त्याच्यावर साळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.