

सिंधुदुर्ग : गणेश जेठे
संपूर्ण जगात लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन शनिवारी जगभर साजरा होत असताना आणि आपल्या देशात आणि राज्यात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्हयाला मात्र वेगळीच चिंता लागून राहिली आहे. देशात आणि राज्यात लोकसंख्या वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्हयात मात्र लोकसंख्येतील घसरण अस्वस्थ करणारी आहे.
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कुटुंब नियोजनाच्या १९०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्हयाच्या आरोग्य विभागाला दिले असले तरी हा कुटुंब नियोजन कार्यक्रमच आता जिल्हयासाठी अडचण वाटू लागला आहे. सर्वात कमी ६.६ इतका जन्म दर आणि सर्वात जास्त १३ इतका मृत्यू दर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही गंभीर परिस्थिती उघड करणारी आकडेवारी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहिर केली. या आकडेवारीनुसार पुढच्या १० वर्षात जन्म दर वाढला नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा वृद्धत्वाकडे झुकत जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
माता बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, बालकांचे उत्तम संगोपन करणे ही जरी कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे असली तरी लोकसंख्येला कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे असली तरी लोकसंख्येला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे असल्यामुळे हा कार्यक्रम जिल्हयासाठी अडचणीचा ठरत आहे.
चार वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट २४०० इतके होते. गेल्या तीन वर्षात ते १९०० इतके खाली आले आहे. त्यापैकी गेल्या वर्षभरात २५० इतक्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कुटुंब नियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे गेली २०-२५ वर्ष सिंधुदुर्ग जिल्हयात राबवला जातोय. शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांनी दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. त्याचा परिणाम जन्म दर घटण्यामध्ये झाला. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येवर झाला आहे. अनेक शाळा पटसंख्ये अभावी बंद पडत आहेत. त्यात पुन्हा स्थलांतर वाढले आहे. परिणामस्वरूप जिल्ह्याची एकूणच लोकसंख्या वेगाने घटन चालली आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जे हेड काऊंटिंग झाले त्यानूसार सिंधुदुर्गची लोकसंख्या गेल्या १६ वर्षात ४ लाख ४९ हजारावरून ७ लाख २७ हजारावर आली आहे. १ लाख २६ हजाराने लोकसंख्येत घट झाली आहे. अशी लोकसंख्येची मोठी घसरण असताना लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने जो कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविला जात आहे तो अडचणीचा ठरत असल्याचे अनेकांचे मत आहे. देशात आणि महाराष्ट्रात या कुटुंब नियोजनाची गरज असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र या कार्यक्रमाचा पुर्नविचार करावा अशी स्थिती निर्माण झाली
जन्मदराच्या दुप्पट मृत्यू दर
संपूर्ण देशाचा जन्म दर १९.१ इतका आहे. महाराष्ट्राचा जन्म दर १४.७ इतका आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू ६.५८ इतका असून तो महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. मृत्यू दर देशात ६.८ इतका असून महाराष्ट्राचा ६.६ इतका आहे. त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्हयाचा मृत्यू दर मात्र ११.७३ इतका आहे. अर्थातच हा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.