

Mango Cultivation Sindhudurg Devgad
नांदगाव: दिवाळीच्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या वाशी मार्केट येथे दाखल झाली. ही पेटी पाठवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडवणे गावचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले आंब्याच्या पेटीला विक्रमी २५ हजाराची बोली लागत दर मिळाला.
ऐन हंगाम नसताना ही किमया करणा-या प्रकाश शिर्सेकर यांना मिळालेला हा बहुमान जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला प्रेरणादायक आहे. असे शेतकरी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने योजना आखून हंगाम नसताना आंबा बाजारात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करून हापूस आंब्याचा सिंधुदुर्ग पॅटर्न निर्माण करण्याची गरज आहे.
हापूसचे उत्पादन भारतात प्रामुख्याने कोकणात होते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.जगभरात देवगड हापूसला मागणी मोठ्या प्रमाणात आहे.त्यात केरळ, गुजरात, कर्नाटक यांसह इतर राज्यातून आंबा येतो मात्र इतर राज्यातील आंब्याच्या सालीत व चवीत फरक आहे. तर देवगड हापूस रसाळ व चवीस चांगला असल्याने हापूसला पसंती मिळते. मात्र सरराचा आंबा मार्च एप्रिल महिन्यात बाजारात येत असतो. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही समुद्र किनारी असणा-या बागेत खा-या हवेमुळे काही आंब्याच्या झाडांना मोहराचे बाळसे येण्यात सुरवात होते.
मात्र, हा मोहर टिकवल्यास नक्कीच आंब्याच्या हंगामाच्या पाच महिने आधीच देवगड हापूस बाजारात येऊ शकतो. तसेच काही आंबा उत्पादक शेतकरी असा प्रगोग आपल्या आंबा बागेत हल्ली करताना दिसतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यानी मेहनत घेत २०२५ ची पहिली सहा डझन पेटी पाठवून त्यांना पंचवीस हजार दर मिळाला आहे. याबाबत हंगाम नसताना आंबा उत्पादन केल्याची माहिती घेतली असता त्याच्या संपूर्ण बागेतील दोन कलमांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोहर फुटला होता. पहिल्या पावसात खा-या हवेमुळे हा कलमांना मोहर फुटतो, असे त्यांनी सांगितले.
त्यानतंर फवारणी करून त्या झाडावर मोहोर आलेल्या बाजूने प्लास्टिक कागद लावून घेत वाढत्या वा-यामुळे चिवा काठी टिकत नसल्याने लोखंडी पाईपचे स्टक्चर करून झाडावर कागद लावत काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाऊस रोज पडला. तर दोन तीन दिवसांनी फवारणी केली जाते. ही फवारणी फक्त बुरशीनाशक व आंब्यावर काळा डाग पडू नये, यासाठी फक्त केली. यानतंर ऑगस्टमध्ये फळ धारणा सुरवात झाल्यानतंर ती फळ दिवाळी काळात परिपक्व झाल्यानंतर आपण पहिली पेटी वाशी मार्केट येथे पाठवली असल्याचे सांगितले.
देवगड-रत्नागिरीतील शेतकऱ्याच्या बागेत अशा प्रकारे मोहोर बागेमध्ये येतो. मात्र काहीच शेतकरी अशाप्रकारे संगोपन करतात कारण ही खर्चिक बाब असल्याने अनेक शेतकरी यात पडत नाहीत. मात्र, शिर्सेकर यांनी आपण अंगमेहनत घेत स्वतः सर्व कामे करत असल्याने जेमतेम पंधरा हजारांच्या आसपास खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. मला आवड व देवगड परिसरातील एक नाव हापूससाठी प्रसिद्ध असल्याने आपण हे करत असल्याचे सांगितले. आपण केलेला प्रयोग सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागातील शेतकरी पाहण्यासाठी येत आहेत.
देवगड परिसरात अनेक बागेत अशी पहिल्या पावसाच्या खा-या हवेत अनेक कलमे येत असतात. मात्र, मेहनत व खर्च जास्त असल्याने काहीच शेतकरी असा प्रयोग करतात. मात्र, कृषी विभागाने सहकार्य करून व शासनाने प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिल्यास अनेक शेतकरी अशाप्रकारे हंगाम नसतानाही आंबा बाजारात आणू शकतात.
आपणाकडे खा-या हवेमुळे अशाप्रकारे कलमाना मोहर फुटत आहे . कातळपट्यातील कलमेच आजूबाजूला झाडी झुडपे नसलेल्या भागात असणा-या कलमाना असा फक्त मोहर येऊ शकतो. हा मोहर टिकवला तर हंगाम नसताना आंबा उत्पादन होऊ शकते.
- प्रकाश शिर्सेकर, आंबा बागायतदार