आरवली : जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आता रायवळ आंब्याच्या कैऱ्या विक्रीस दाखल होत असून त्यांना मोठी मागणी आहे. उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या कैऱ्यांचे पन्हे व सरबत अशा शीतपेयांची मागणी वाढते. यावेळी पावसाळा लांबल्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिरा मोहोर आला होता.
पण मोहोर गळतीमुळे झाडांना कमी प्रमाणात फलधारणा झाली. इतर ठिकाणच्या हवामानापेक्षा समुद्र किनाऱ्याजवळील रायवळ आंब्यांना मध्यम प्रमाणात फलधारणा झाली. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील आंबा बागायतदारांकडून स्थानिक बाजारपेठेत कच्च्या कैऱ्या आणून त्यांची विक्री केली जात आहे. कैरीच्या प्रतवारीनुसार ५० रुपयांना पाच मध्यम आकाराच्या कैऱ्यांची विक्री होत आहे.
स्थानिक बाजारपेठेत या कैऱ्यांना चांगली मागणी आहे. करी व कालवणामध्ये कैरीचा वापर केला जातो. कैरीचे पन्हे, लोणचे, मुरांबा, कच्चे लोणचे यासाठी ग्राहक प्राधान्याने कैऱ्या विकत घेतात. कैरीच्या फोडी मीठ व हळद पाण्यात भिजवून वाळवतात. त्याचा वर्षभर गरजेनुसार वापर केला जातो. मीठ व मसाला लावून केलेल्या ताज्या कैरीची खिरमट जेवणाची लज्जत वाढवते. ग्रामीण भागात कैऱ्या सहज उपलब्ध होत असल्या तरी शहरी भागात त्या मिळत नाहीत. त्यामुळे शहरातून कैऱ्यांना चांगली मागणी असते.