

Sixty tons of watermelon in three acres, income of fourteen lakhs
गेवराई : तालुक्यातील रानमळा येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ कचरू जाधव यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत अवघ्या तीन एकर क्षेत्रात टरबूज पिकातून तब्बल साठ टन उत्पादन घेत सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टरबूज लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, दर्जेदार बियाण्यांची निवड, ठिबक सिंचन व्यवस्था, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी रोग-किड नियंत्रण यावर जाधव यांनी विशेष भर दिला. नियोजनबद्ध पद्धतीमुळे पिकाची वाढ समसमान झाली तसेच फळांचा दर्जा उत्कृष्ट राहिला.
कापणीपूर्वीच स्थानिक व जवळच्या बाज ारपेठांशी संपर्क साधून दर निश्चित केल्याने उत्पादनाला चांगला भाव मिळाला. वाहतूक व साठवण व्यवस्थापन योग्य केल्यामुळे नुकसान टळून नफा वाढला.
शेती ही केवळ नशिबावर नाही, तर योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मेहनतीवर अवलंबून असते, असे सांगत नवनाथ जाधव तरुण शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिकांकडे वळावे, असे आवाहन करतात. कमी क्षेत्रातही मोठे उत्पादन आणि चांगले उत्पन्न शक्य असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
कार्यक्रमात कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत घ्यावयाची काळजी, पाणी व खत व्यवस्थापन तसेच हवामानातील बदलांचा पिकावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोशल मीडियावर पाहून शेती करता येत नाही; प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी असते. योग्य नियोजन केल्यासच उत्पन्न मिळते, असे पेजगुडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास रामेश्वर आबासाहेब पेजगुडे, प्रवीन भालके यांच्यासह अनेक शेतकरी, मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.