

भरवस्तीतील घरे फोडल्याने गावात खळबळ
मालक घरी आल्यानंतर अन्य घरातील चोरीची वस्तुस्थिती स्पष्ट होणार
चोरट्यांचा रोकड व किंमती वस्तू चोरण्याकडे कल
वैभववाडी : नेर्ले -राववाडी व पाटीलवाडी येथील भर वस्ततीतीली आठ बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. यापैकी एका घरातील 1 लाख 25 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले तर अन्य घरातील सामान विस्कटून टाकले. मात्र, त्यांच्या हाती पैसे अथवा मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत. ही घटना शनिवारी मध्यरात्री 1. 30 वा.नंतर घडली आहे. नेर्ले गावात अशा प्रकारची चोरीची ही पहिलीच घटना असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकाच गावात एकाच वेळी आठ घरे चोरट्यांनी फोडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नेर्ले गावातही नवरात्रोत्सव कार्यक्रम सुरु आहेत.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ जागे असतात. गावातील गणपती मंदिराचे पुजारी यशवंत खानविलकर हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. त्यांना गणपती मंदिरानजीक असलेले संदीप धनाजी खानविलकर यांच्या बंद घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यांनी पुढे जाऊन पाहिले त्यांना पुढच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली. संदीप खानविलकर यांचे घर चोरट्यांनी फोडल्याची माहिती गावात समजली. त्यानंतर राववाडी ग्रामस्थांनी आपल्यावाडीतील बंद घरांची पाहणी केली असता, संतोष विठ्ठल खानविलकर, शेखर रघुनाथ खानविलकर, सुनील शिवाजी खानविलकर, अविनाश राजाराम खानविलकर अशी मिळून पाच बंद घरे चोरट्याने फोडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तर नेर्ले -पाटीलवाडी येथील शिवाजी भिकाजी पाटील, निनाद श्रीधर पाटील, वसंत पांडुरंग पाटील यांची बंद घरेही चोरट्यांनी फोडल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी फोडलेल्या सर्व घरांचे मालक मुंबईला राहतात. या चोर्यांची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहा.उपनिरीक्षक राजन पाटील, गणेश भोवड, अभिजित तावडे, कृष्णात पडवळ, रणजीत सावंत, श्री. मेथे, जितेंद्र कोलते यांनी नेर्लेे गावात जात चोरी झालेल्या सर्व घरांचा पंचनामा केला आहे. संबंधित घर मालकांशी स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क साधात झालेल्या चोरीच्या माहिती दिली आहे.
यातील संतोष विठ्ठल खानविलकर यांच्या घराच्या समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील 1 लाख 25 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. हे पैसे संतोष खापविलकर यांनी दसर्यानंतर घर दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेवले होते. याबाबत या घराची देखभाल करणारे विश्वास राजाराम पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अन्य घरातील काही चोरीस गेले आहे का, याची नेमकी माहिती संबंधित घर मालक गावी आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, फोडलेल्या घराची पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील टी व्ही किंवा अन्य वस्तुंना हात लावलेला नाही. तर त्यांचा कल हा रोख रक्कम व मौल्यवानवस्तूकडे दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच श्वान पथकांने नेर्ले गावात भेट दिली. सर्व फोडलेल्या घरात श्वानाला फिरवण्यात आले. मात्र श्वान फक्त घरात घुुटमळत राहिले. स्थानिकांच्या माहिती नुसार रात्रभर पाऊस पडत होता. तसेच शनिवारी दिवसभर पाऊस होता. यामुळे श्वानाला चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. ठसेतज्ज्ञांच्या टीमनेही चोरी झालेल्या सर्व ठिकाणचे ठसे घेतले आहेत. सायंकाळी उशिरा गावात मोबाईल फॉरेन्सिक लॅबची गाडीही दाखल झाली होती.
चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वैभववाडी पोलिसांसमोर आहे. या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गावात कार्यक्रम सुरु असताना चोरट्यांनी भर वस्तीतील घरे फोडली आहेत. त्यामुळे चोरट्यांनी या घरांची अगोदरपासूनच रेखी केली असल्याची शक्यता आहे.