

मालवण : शिवकालीन परंपरा लाभलेल्या मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवास शुक्रवारी सायंकाळी मालवण बंदरजेटीवर हजारोच्या संख्येने जनसमुदाय लोटला. मालवणातील मच्छीमार व व्यापारी बांधव यांच्या साक्षीने अथांग सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी मालवणातील व्यापार उद्योगाला चालना दे, मासेमारी व्यवसायाला बरकत दे... असे साकडे सागराला घालण्यात आले.
नारळी पौर्णिमेनिमित्त खवळलेल्या महासागराला श्रीफळ अर्पण केल्यानंतर समुद्र शांत होतो. मग मच्छीमार बांधव मासेमारी व्यवसायाचा श्री गणेशा करतात, अशी या सणाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्गवर सायंकाळी सोन्याचा मुलामा असलेल्या श्रीफळाची विधिवत पूजा करण्यात आली. किल्ल्यावर तोफांची सलामी दिल्यावर प्रथम मानाचे श्रीफळ सागराला अर्पण करण्यात आले. त्यानंतर मालवण बंदर जेटीवर मालवण व्यापारी संघाच्या वतीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.
मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे श्रीफळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत व्यापारी महिला व मच्छीमार महिलाही नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. आ. नीलेश राणे, माजी आ. वैभव नाईक, हरी खोबरेकर, किरण वाळके, मयु पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, नानाशेठ पारकर, रवी तळाशीलकर, नितीन वाळके, बाळू अंधारी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अशोक सावंत, विजय केनवडेकर, विजय नेमळेकर, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, गणेश प्रभुलीकर, परशुराम पाटकर, दीपक पाटकर, नितीन तायशेट्ये, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक एस. एस. खाडे, लायन्स क्लबच्या वैशाली शंकरदास, मुकेश बावकर किरण कारेकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात नारळ लढविण्यासाठी नेहमी गर्दी होते. लहानापासून वृद्धापर्यंत नारळ लढविण्यासाठी चढाओढ असते. यावेळी मालवण बंदरजेटीवर नारळ लढविण्यासाठी गर्दी झाली होती. भाजप, उबाठा शिवसेना, माजी नगरसेवक यतीन खोत व सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ व काँग्रेसचे अरविंद मोंडकर यांच्या वतीने खास महिलांसाठी नारळ लढविणेे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लाखो रुपये तसे दागिने बक्षीस असलेल्या या स्पर्धा लक्षवेधी ठरल्या.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवप्रभूंची शिवलंका म्हणून ओळखल्या जाणार्या किल्ले सिधुदुर्गवरही शुक्रवारी सायंकाळी ऐतिहासिक परंपरेनुसार समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.