

मडुरा : कोंडुरा येथे बिबट्याने माणसावर केलेला हल्ला ताजा असताना आता आरोंदा रेडकरवाडी येथील शेतकरी विनायक अर्जुन रेडकर यांच्या घराशेजारील गोठ्यात शनिवारी रात्री 1.30 वा. बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला केला. यात वासराचा मृत्यू झाला.
दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने वन्यप्राणी आता मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राणी, जनावरे, माणसांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोंदा रेडकरवाडी येथील अर्जुन रेडकर यांच्या वासरावर हल्ला झाल्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे प्रकाश रानगिरे, श्री. पडते घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी आरोंदा उपसरपंच गोविंद (आबा) केरकर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश नाईक उपस्थित होते.
वन्य प्राण्यांकडून वारंवार अशा हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपसरपंच आबा केरकर यांनी केली आहे. तसेच संबंधित घटनेविषयी आपण वनविभागाला निवेदन देणार असल्याचे श्री. केरकर यांनी सांगितले.