

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
भिरवंडे येथून कणकवलीकडे येणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (वय ७५, रा. भिरवंडे - मुरडवेवाडी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने दुचाकीस्वार बचावला.
हा अपघात रविवारी रात्री कणकवली-कनेडी राज्यमार्गावर सांगवे - पामतेल फाटा नजीक वळणावर घडला. शुभम बद्रिनाथ सावंत (२७, रा. भिरवंडे मुरडवेवाडी) यांनी या अपघाताची खबर दिली. शुभम हे रविवारी रात्री दुचाकीने कणकवलीकडे येत होते. त्यांच्या दुचाकीवर मागे बाळकृष्ण सावंत बसले होते.
कनेडी येथून सांगवेच्या उताराने ते येत असताना पामतेल फाटा नजीक वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक देऊन तो पसार झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण सावंत हे रस्त्यावर फेकले जाऊन डोक्यावर आपटले.
त्यांच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. उपचारापूर्वीच गंभीर दुखापत झालेले बाळकृष्ण सावंत यांचा मृत्यू झाला. मनमिळाऊ स्वभावाच्या बाळकृष्ण सावंत यांच्या अपघाती निधनाने भिरवंडेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे रेल्वे अपघातात त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते, तर सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या घटना ताज्या असतानाच बाळकृष्ण सावंत यांच्या अपघाती निधनाने सावंत कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.