Sindhudurg Heavy Rain: अवकाळी बिघडवणार आंबा, काजूचे अर्थकारण; मोहोर लांबणीवर, शेतकरी चिंतेत

Sindhudurg Heavy Rain: अवकाळी बिघडवणार आंबा, काजूचे अर्थकारण; मोहोर लांबणीवर, शेतकरी चिंतेत


सिंधुदुर्ग : मागील १० वर्षांपासून सातत्याने कोकणातील हापूस आंबा आणि काजू पिकाला लहरी हवामानाचा फटका बसत आहे. यंदाचा हंगामही त्याला अपवाद नाही. ऐन मोहोर येण्याच्या काळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे जमीन थंड होवून मोहोर लांबणीवर पडणार आहे. त्याचबरोबर कलमांना पुन्हा पालवी येण्यास सुरूवात झाली असून वातावरणात बाष्प वाढल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढणार आहे. तसेच अवकाळीमुळे केलेली फवारणीही वाया जाण्याची भीती आहे. एकूणच मोहोर लांबल्याने हापूसचा हंगाम लांबणार असून हापूसबरोबरच काजू पिकाचेही अर्थकारण बिघडण्याची शक्यता शेतकरी, बागायतदार आणि कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे. Sindhudurg Heavy Rain

सिंधुदुर्गात सुमारे ४५ हजार हेक्टरवर हापूस आंब्याची लागवड आहे. हापूसला नोव्हेंबर, डिसेंबरपासून मोहोर येण्यास सुरूवात होते. सद्यस्थितीत केवळ ५ ते १० टक्के कलमांचा मोहोर आला आहे. मात्र, आता या अवकाळीमुळे मोहोर लांबणार आहे. त्यातच मधल्या काळात वातावरणातील उष्णता वाढल्याने आंबा कलमांना जोरदार पालवी आली होती. ती टिकवण्यासाठी काही बागायतदारांनी फवारणी सुरू केली होती. मात्र, अवकाळीमुळे तीही वाया जाण्याची भीती आहे. आंबा कलमांना पालवी आल्याने आणि आता पावसामुळे मोहोर लांबणार असल्याने पहिल्या हंगामाचा जादा दर मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबणार असून शेतकरी, बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार हे निश्चित. Sindhudurg Heavy Rain

काजू पिकालाही लहरी हवामानाचा फटका

हापूस आंब्याबरोबरच कोकणातील डॉलर पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या काजू पिकालाही लहरी हवामानाचा फटका बसत आहे. आंब्याच्या तुलनेत काजू पीक तेवढे नाजूक नसले, तरी अवकाळीमुळे काजूचा मोहोरही लांबणार आहे. सिंधुदुर्गात जवळपास ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर काजू पीक लागवड करण्यात आली आहे. बदलेले हवामान पाहता जमिनीतून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बुरशीनाशक फवारणी करण्याची गरज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Sindhudurg Heavy Rain : अवकाळीमुळे नुकसान अटळ

कणकवलीतील कृषी तज्ज्ञ संदीप राणे यांच्याशी संपर्क साधला असता बदललेल्या हवामानामुळे आंबा, काजू फळपिकावर परिणाम होणार हे १०० टक्के खरे आहे. वातावरणातील बदल अनिश्चित आहेत. मोहोर येण्याच्या काळातच पालवी येण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस पडला की वातावरणातील बाष्प वाढते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. आंब्यावर तुडतुडयाचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अलर्ट राहावे लागेल, असे मत राणे यांनी व्यक्त केले. तर देवगडमधील आंबा बागायतदार सुधीर जोशी यांनी अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले. तर नुकसान निश्चित असल्याचे सांगितले. दरवर्षी आंबा उत्पादनाचा खर्च वाढत आहे. त्या तुलनेत उत्पादन मात्र घटत आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना ते परवडणारे नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news