

आचरा; पुढारी वृत्तसेवा : आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांनी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना आज (दि.२५) समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सुर्यकांत आबा धुरी यांना मिळाली. त्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले होते. मंगळवारी (दि. २४) ५१ दिवसांनी ही कासवाची ७५ पिल्ली अंड्यांमधून बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती.
कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होतात. अॕलिव्ह रिडले ह्या कासव जमातीचे कासव या किनाऱ्यावर अधिक पहायला मिळतात. तळाशील ते आचरा हा कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी न पळवता अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करतात. दोन महिन्यांनी ही पिल्ले बाहेर पडली. त्यानंतर वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडण्यात आली.
यावेळी वनविभागाचे संजू जाधव, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, शरद धुरी, अजय कोयंडे, जितेंद्र धुरी, ममता मुळेकर, गणधाली धुरी, गायत्री वाडेकर, स्वप्नील जोशी, नंदू तळवडकर, शुभ्रा धुरी, तृप्ती धुरी, सृष्टी धुरी, चंदना धुरी, हिमाली कुमठेकर हे पिरावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा