रत्नागिरी शीळ धरणावरील जॅकवेल कोसळले; कामगार बचावले
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅकवेल कोसळले आहे. सुदैवाने ही जॅकवेल कोसळताना कामगारांनी बाहेर उड्या टाकल्याने ते बचावले आहेत. मात्र आता नवीन जॅकवेल सुरू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एमआयडीसी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे.
आज दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी तुशार बाबर यांनी सांगितले आहे. आज पहाटे जॅक वेल कोसळताच माजी नगरसेवक निमेश नायर आणि नगर पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवीन जॅकवेल बांधून पूर्ण झाली आहे. नवीन जॅकवेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो. यातून काही मार्ग निघतो का? यावर विचार सुरू आहे. सर्व नागरिकांना ज्या माध्यमातून पाणी मिळेल त्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, एमआयडीसीतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याने, उद्योगांचीही पाणी कपात होण्याची शक्यता आहे, उद्योजकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :

