

रत्नागिरीः पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात चालू वर्षी वाढती थंडी, वातावरण बदल, अवकाळी पावसामुहे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त आंबा, काजू पिकाचे पंचनामे करण्याचे काम गेला दीड महिना सुरू होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून १५ टक्के पंचनामे शिल्लक आहेत.
जिल्ह्यातील ५६,४२० शेतकऱ्यांचे ४८,७९१.८८ हेक्टर क्षेत्र बाधित असलयाचे स्पष्ट झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात वातावरण बदलामुळे १५ ते २० टक्के आंब्याचे पीक आल्याचे कृषी विभाग, कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते.
तसा अहवाला ही देण्यात आला शासनाने हेक्टर २२५० रूपये मदत जाहीर केली. पंरतु ही मदत खूप कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मदत घेण्यास विरोध केला. कोकणातून शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार बाधित क्षेत्राचे एनडीआरएफ निकषानुसार तातडीने पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे सूचना केली होती. मात्र संबधित नुकसानाचे मूल्यमापन अचूक होण्यासाठी पंचनामे कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त करण्यात आले.
बाहेरगावी राहणाऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे शिल्लक
जिल्ह्यात आंबा, काजू फळबागांचे उत्पादन क्षेत्र १ लाख ५६ हजार ९६० हेक्टर आहे. जिल्ह्यातील ५६,१२० शेतकऱ्यांच्या ४८, ७९१.८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागील दीड महिन्यापासून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप बाहेरगावी राहणाऱ्यांच क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहे.
आतापर्यंत ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून १५पंचनामे शिल्लक आहेत. काही पंचनामे राहिले असून सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.
शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी