

Ratnagiri Airport Terminal 90% Complete, Flight Operations Expected in the New Year
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरीकरांचे गेल्या अनेक वर्षांचे विमान प्रवासाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येण्याचे सुवर्णक्षण जवळ आले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रत्नागिरी विमानतळाचा विकास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या नववर्षात रत्नागिरीकरांना मुंबई गाठण्यासाठी विमानाचा जलद, सोयीस्कर आणि सुखकर पर्याय उपलब्ध होणार आहे. विमानतळ टर्मिनलचे जवळपास नव्वद टक्केहून अधिक काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे विमानतळ नागरीउड्डाणासाठी सज्ज होईल.
या विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला २ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात झाली असून, केवळ १०० कोटी रुपयांच्या खर्चात २५ एकर जागेवर हे अद्ययावत विमानतळ उभे राहत आहे. सध्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे तब्बल १० टक्के काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्य रस्त्यापासून टर्मिनल बिल्डिंगपर्यंतचा १७०० मीटरचा रस्ता आणि धावपट्टी ते टर्मिनल दरम्यानचे ३२७ मीटरचे कामही जवळपास पूर्णत्वाला जाण्याच्या तयारीत आहे. केवळ टर्मिनलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची कामे, पार्कींग, मार्कीग अशी काही कामे शिल्लक आहेत.
या विमानतळावरून ७२ आसनी विमाने उड्डू शकणार असून एकाच वेळी ४ विमाने पार्क करण्याची क्षमता येथे असेल. व्यावसायिक उड्डाणांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड) धावपट्टीचा वापर केला जाणार असून, उर्वरित सर्व ऑपरेशन्स तटरक्षक दलाच्या संरक्षण भिंतीबाहेर पार पडणार आहेत. या संदर्भात रविवारी ५ जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार होणार आहे.
रत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी सध्या 'अलायन्स एअरलाईन' कंपनी-सोबत बोलणी सुरू आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करून 'डीजीसीए'ची (DGCA) अधिकृत परवानगी मिळताच रत्नागिरीच्या आकाशात विमाने घोंगावू लागतील. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार होत असून कोकणच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
तीन कंपन्यांकडून विमानतळ
परिचारस काम सुरु असल्याचे एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. टर्मिनलचे काम न्याती कंपनीकडे असून ते जवळपास पूर्ण होत आले आहे. टॅक्सीवेचे काम प्रगतीपथावर आहे. इमारतीसाठी आवश्यक पाण्याची सुविधा, जनरेटर सिस्टीम, इलेक्ट्रीकची कामे अंतिम टप्प्यात आहेत. विमानतळ लवकर सुरु करण्यासंदर्भात सर्व यंत्रणा वेगाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
न्याती ग्रुपकडून उभारले जात आहे देखणे विमान टर्मिनल
पुणे येथील न्याती ग्रुपकडून विमानतळ टर्मिनलचे काम सुरु असून या न्याती ग्रुपचे जवळपास दहा ते बारा अभियंते, दीडशे कर्मचारी चौवीस तास तीन-तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. न्याती ग्रुपने सव्वा वर्षाच्या कालावधीत टर्मिनल इमारत बांधण्यात यश मिळवले आहे. टर्मिनलच्या अंतर्गत सुरक्षा उपाययोज-नांसह सजावटीचे काम सुरु आहे. या टर्मिनलमध्ये नैसर्गिक प्रकाशयोजनेचा वापर जास्तीतजास्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक मित्ती चित्रही उभारले जाणार असून त्याचे काम पूणे येथे सुरु आहे. न्याती ग्रुपकडून सुरु असलेल्या कामाचे मंत्री उदय सामंत यांनी कौतूक देखील केले आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा...
विमानतळ टर्मिनलचे काम सुरु झाल्यापासून पालकमंत्री उदय सामंत यांनी सात ते आठ वेळा तर राजापूरलांजाचे आमदार किरण सामंत यांनी सहा ते सात वेळा भेट देत टर्मिनल कामाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी चार ते पाचवेळा भेट देऊन पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. प्रांताधिकारी जीवन देसाई, एमआयडीसी अधिकारी बी. एन. पाटील हे सातत्याने या ठिकाणी भेट देत पाहणी करुन माहिती घेत आहेत.