

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात कार्यरत दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे आता कायम होणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २५० कर्मचाऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
एनएचएमचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्यातील १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्या पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक निधीलाही शासनाकडून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी १४ मार्च २०२४ रोजी मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार १० वर्षापेक्षा अधिक पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्णयात सुधारणा करण्यात आली.
तसेच या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी निकष निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्ष तेखाली आंतरविभागीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि २५ जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मंगळवारी ३० जूनला याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
वारस अनुकंपा नियुक्ती नाही!
शासन निर्णयात अधिसंख्य पदेही व्यक्तीसापेक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा अन्य कारणांनी सेवा संपुष्टात आल्यानंतर ही पदे आपोआप रद्द होतील. त्यामुळे त्या पदांवर नवीन नियुक्ती करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नंतर नियुक्तीही मिळणार नाही.