

देवरुख : सततच्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली. दख्खन ते कळकदरादरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
कोसळलेली दरड सध्या सुरू असलेल्या वाहतूक मार्गाच्या अगदी जवळ येऊन थांबली आहे. महामार्गाच्या मधोमध असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, दगडांचे तुकडे रस्त्यावर आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील एक मार्गिका तात्पुरती बंद ठेवली असून दुसर्या मार्गावरून वाहने सावकाश सोडण्यात येत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने घाट परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.