

मालवण : पुढारी वृत्तसेवा
रेवंडी प्रवासी जेटीवर बेकायदेशीररीत्या मासे उतरविणे तत्काळ बंद करा. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करावेत, अशा मागणीसह, रेवंडी परिसरातील कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने खाडीपात्राचे पाणी शेत जमिनीत शिरून जमीन नापीक होत आहे. गावातील विहिरींचे पाणी खारे होत आहे.
तरी कालावल खाडीपात्रातील गाळ उपसा लिलाव प्रक्रिया राबवून करा. येत्या आठ दिवसांत लिलाव प्रक्रिया न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशार रेवंडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या मागणीसाठी मंगळवारी रेवंडी ग्रामस्थांनी मालवण तहसीलदारांची भेट घेतली. नायब तहसीलदार प्रिया हर्णे यांना हे निवेदन देण्यात आले.
माजी सरपंच युवराज कांबळी, सरपंच अमोल वस्त, उपसरपंच श्रद्धा कांबळी, ग्रामपंचायत सदस्य मेघना कांबळी, तंटामुक्ती सदस्य विजय कांबळी, भावेश कांबळी, विराज तळाशीलकर, प्रिया कांबळी, शुभा कांबळी, राकेश निवतकर, विजया पोयरेकर, प्रथमेश करलकर, नीलेश वेंगुर्लेकर, प्राजक्ता कांबळी, अश्विनी कांबळी आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, रेवंडी-कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे.
या बाबत यापूर्वीही संबंधित विभागाकडे लेखी विनंती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मेरीटाईम विभागा मार्फत वाळू मोजणीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडचणीत येत असून गावात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
भरतीचे पाणी शेतजमिनीत शिरत असल्यामुळे जमिनी नापीक बनल्या आहेत, खासगी जागांमध्ये कांदळवनांचे अतिक्रमण होत आहे तसेच गावातील विहिरींचे पाणी खारे होत आहे. परिणामी पाणीटंचाई सारखी समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहे. या प्रकाराची तात्काळ दाखल घेऊन रेवंडी वाळूपट्ट्यातील गाळ उपसाची लिलाव प्रक्रिया राबवून गळ उपसा करण्यात यावा.
आठ दिवसात योग्य निर्णय न झाल्यास रेवंडी ग्रामस्थाच्या वतीने उपोषण छेडण्यात येईल असा इशार देण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या मासे उतरविणे बंद करा रेवंडी प्रवासी जेटीवर तळाशील येथील मच्छीमारांकडून नियमबाह्य पद्धतीने मासे उतरविण्यात येतात. प्रवासी जेटी ही केवळ प्रवासी वाहतुकीसाठी राखीव असताना तिचा गैरवापर मासळी वाहतुकीसाठी वापर केला जात आहे.
तहसीलदार यांच्या समक्ष तळाशील ग्रामस्थांना बंदर विभाग अधिकाऱ्यांनी ही प्रवासी जेटी असल्याची स्पष्ट केले आहे. तरीही मासळी उतरवली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. जेटी परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मासळीच्या नियमांचे उघड उल्लंघन होणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे प्रवासी जेटीवरून मासे वाहतूक तत्काळ थांबवून तळाशील ग्रामस्थांना लेखी सूचना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.