

खेड, चिपळूण, हातखंबा, तिठा येथे ब्रेकडाऊन व्हॅन असणार
कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके
ठिकठिकाणी सूचना फलक
एसटी कर्मचारी, अधिकार्यांचे स्वतंत्र पथ महामार्गावर असणार
रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन काहीच दिवसात होणार आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमानी कोकणात येण्यास सुरूवात झाली असून लक्झरी बस, फोरव्हीलर, खासगीबसेसद्वारे लांजा, राजापूर, संगमेश्वर याठिकाणी सकाळपासून आली आहेत. उर्वरित मुंबईकर रविवारी एसटी, रेल्वेने कोकणात येणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी यावर्षी एसटी महामंडळाकडून यंदा 5 हजार बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 22 ते 26 ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून तब्बल 2930 बसेस दाखल होणार आहेत.
कोकणवासीय आता मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणातून निघत असून खासगी वाहन, लक्झरी बसने कोकणात दाखल झाले आहेत. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या मुंबईकरांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 23 ऑगस्टपासून ते 27 ऑगस्टपर्यंत जादा गाड्या कोकणात येणार आहेत. मंडणगड ते राजापूर या तालुक्यात जादा गाड्या येणार आहेत. आलेल्या सर्व गाड्या परतीच्या प्रवासाठी सोडण्यात येणार आहेत. सर्वच आगारात पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थाची सोय, आगार, प्रसाधनगृह स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणी राहणार्या कोकणावासीयांना आणण्यासाठी रत्नागिरी विभागातील एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. या चार दिवसात सर्व बसेस रत्नागिरी विभागात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सव झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटी 2500 बसेस सोडणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू असून आतापर्यंत 1400 लालपरीचे तिकीट कन्फर्म झाले आहे. ज्यांनी ऑनलाईन आरक्षण केले नाही त्यांनी तातडीने तिकीट बुकिंग करावे, असेही आवाहन एसटीतर्फे करण्यात आले. 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत तर 65 वर्षावरील, महिलांना तिकीटात 50 टक्के सवलत तसेच पुरूषांना सवलतधारक वगळून 15 टक्के तिकिटात सवलत असून याचाही लाभ घ्यावा.
गणपती जादा वाहतुकीसाठी मुंबई-ठाणे, पालघर कडून 22 ऑगस्ट रोजी 2 एसटी बस, 23 ऑगस्ट रोजी 234 बस, 24 ऑगस्ट रोजी 1395 बस, 25 ऑगस्ट रोजी 1200 बस, 26 ऑगस्ट रोजी 2930 बस दाखल होणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त येणार्या चाकरमान्यांना रस्ता सुरक्षेसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक माहितीचे पोस्टर लावण्यात आले आहे. वाहने वेगाने चालवू नका, सावकाश चालवा, पुढे उतार, घाट असून वाहने सावकाश चालवा यासह विविध पोस्टर रस्त्यालगत लावण्यात आले आहे.