राजापूर; पुढारी वृत्तसेवा : बारसू रिफायनरी विरोधात मागील तीन दिवसांपासून स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. आज (दि. ५) बारसुच्या सड्यावर आंदोलक जमायला सुरवात झाली आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची जोरदार चर्चा प्रकल्प क्षेत्रासह तालुक्यात दिवसभर सुरु होती. मात्र, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. दरम्यान, शनिवारी (दि. ६) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसूला भेट देणार आहेत.तर दुसरीकडे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ समर्थकांचाही मोर्चा काढण्यात येणार असल्याने राजापूर तालुक्यातील वातावरण तापू लागले आहे.
मागील काही दिवसांपासून प्रस्तावित बारसू रिफायनरीचा मुद्दा पेटला आहे. बारसूच्या सड्यावर माती परीक्षणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु असून ते काम बंद पाडण्यासाठी सरसावलेले प्रकल्प विरोधी आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष झाला होता. पोलिसांनी लाठीमार व अश्रुधूर सोडल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला होता. त्यानंतर अचानक तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा आंदोलकांनी केली होती. त्यामुळे गेले काही दिवस बारसू परिसरात शांतता होती. मात्र शनिवारी बारसु प्रकल्पाविरोधात आंदोलकांना भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजापुरात येत आहेत. ते बारसूला भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधतील.
तर दुसरीकडे प्रकल्पाच्या समर्थनार्थ माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रकल्प समर्थनार्थ व विरोधात यापूर्वी एकाच वेळी असे मोर्चे निघाले नव्हते. प्रथमच असे दोन परस्पर विरोधी भूमिकेतून मोर्चे निघणार असल्याने प्रशासनासह पोलीस दलाची जबाबदारी वाढली आहे. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वातावरण तापणार आहे.
प्रकल्प विरोधकांकडून विरोधाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे प्रकल्प समर्थकांकडूनही समर्थनार्थ मोर्चाची जय्यत तयारी सुरु होती. 'अभी नही तो कभी नही', अशी त्यांची रोखठोक भूमिका ऐकायला मिळाली. एकाच दिवशी प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाचे दोन परस्परविरोधी कार्यक्रम होणार असल्याने प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
हेही वाचा