राजापूर : रिफायनरी प्रकल्‍पालाच्या माती सर्वेक्षणाला विरोध; ३० ते ३५ महिला आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात | पुढारी

राजापूर : रिफायनरी प्रकल्‍पालाच्या माती सर्वेक्षणाला विरोध; ३० ते ३५ महिला आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात

राजापूर : पुढारी वृत्‍तसेवा बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम जरी सुरु झाले नसले, तरी त्या कामाला विरोध करण्यासाठी सोमवार पासून बारसुच्या सड्यावर आंदोलक ठिंय्या मांडून बसले आहेत. या आंदोलकांना आज (मंगळवार) पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर झोपून आंदोलन करणाऱ्या सुमारे तीस ते चाळीस महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या सर्वांना रत्नागिरीला नेण्यात आले आहे. दरम्यान बारसू परीसरात मोठ्याप्रमाणावर पोलिस कुमक तैनात करण्यात आली असुन, या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

बारसू परीसरातील प्रस्तावित माती परीक्षणाच्या कामात प्रकल्प विरोधकांकडून अडथळे येवु नयेत म्हणुन गेल्‍या रविवारी (दिनांक २३ एप्रिल) राजापूर तहसीलदार शीतल जाधव यांच्या सहीनिशी दिनांक २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला गेला. रविवार पासूनच बारसूच्या सड्यावर प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक गोळा होवु लागले होते. सोमवारीही सड्यावर मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाले होते. मात्र परिस्‍थिती शांत होती. माती परीक्षणाचे काम देखील सुरु झाले नव्हते.

आज (मंगळवार) सकाळी काही महिला भगीनींनी रस्त्यावर पुन्हा ठिय्या मांडला आणि रस्ता अडविला. त्या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले आणि रत्नागिरीला नेले. या विषयी मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ३० ते ३५ महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली, तर रिफायनरी मुंबई संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांनाही पोलिसांनी राजापुरात ताब्यात घेतले आहे. आंदोलकांना ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरवात केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button