Sambhajiraje Chhatrapati : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांना भेटणार | पुढारी

Sambhajiraje Chhatrapati : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांना भेटणार

पनवेल; विक्रम बाबर : मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा माध्यमातून मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली. या वेळी या आंदोलकावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. हे गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतले नाहीत. हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो होतो. त्या वेळचे तत्कालीन मंत्र्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाईल, असे आश्वासन मला दिले होते. मात्र याचा विसर सरकारला पडला असावा. यासाठी मी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गुन्हे मागे कसे घेता येईल याची चर्चा करणार आहे, असे आश्वासन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी कामोठे येथील एका कार्यक्रमाप्रसंगी दिले.

स्वराज्य संकल्प अभियान अंतर्गत, रविवारी (९ ऑक्टो) स्वराज्य शाखेचे उद्घाटन कामोठे वसाहतीमध्ये स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी ते बोलत होते. स्वराज्य संकल्प अभियानाला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील पहिल्या स्वराज्य शाखेचे उदघाटन नवीन पनवेल येथे करण्यात आले. खांदा कॉलनी, कामोठे, पनवेल, करांजडे या शहरात देखील या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी कामोठे वसाहतीमधील शाखेचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत थोर समाजसेवक राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद साबळे, माजी नगरसेवक गणेश कडू, अल्पेश माने, सुलक्षणा जगदाळे, गणेश मुळीक यासह सखल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी संभाजीराजे छत्रपती उपस्थितांना संबोधीत करत असताना म्हणाले की, स्वराज्य संघटनेची स्थापना, कष्टकरी, सामान्य नागरिक, वंचित घटक, विद्यार्थी तसेच गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली आहे. या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन सरकारवर दबाव आणू शकतो. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रत एक वेगळे परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्यासाठी आपण स्वराज्याच्या छत्रछायेखाली एकत्र येऊन लढा देऊ, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या उदघाटनानंतर संभाजी राजे यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील अन्य शहरात स्वराज्य शाखेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button