रत्नागिरी : बनावट दागिने देऊन १० लाखांना फसविणारी टोळी गजाआड | पुढारी

रत्नागिरी : बनावट दागिने देऊन १० लाखांना फसविणारी टोळी गजाआड

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे बनावट दागिने खरे असल्याचे भासवून महिलेची सुमारे 10 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या टोळीच्या शहर पोलिसांनी शनिवारी (दि. ९ जुलै) रात्री मुसक्या आवळल्या. रविवारी न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच यातील दोन महिलांना रविवारी (दि.१० जुलै) सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली.

गंगाराम बघेल, हरीभाई वाघडी, लक्ष्मणभाई लालजी भाई वाघेले, गिताबेन वाघेले आणि शांती चव्हाण (सर्व मुळ रा.अहमदाबाद,गुजरात सध्या रा.मिरजोळ पाडावेवाडी,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.

याबाबत एप्रिल 2022 मध्ये देवरुख येथील महिलेची प्रथम या टोळक्याने फसवणूक केली होती. या महिलेच्या दुकानात यातील संशयितांनी जाऊन सोन्याची माळ आणि चेन दाखवून ते कमी किंमतीत विकायचे असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी सोन्याचा मणी तिच्याकडे तपासायला दिला होता. त्या महिलेने सोनाराकडे जाऊन तपासणी केल्यावर तो मणी खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितांनी महिलेला व तिच्या पतीला 1 किलो सोन्याचे दागिने 10 लाख रुपयांत देण्यासाठी माळनाका येथील ब्रीजखाली बोलावून हा व्यवहार करण्यात आला होता.

दरम्यान, कालांतराने ते दागिने सोन्याचा मुलामा दिलेले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. हा गुन्हा नंतर देवरुख पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला परंतू, फसवणूक रत्नागिरी येथे झाल्याने तो शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

याबाबत तपास करताना शहर पोलिसांनी शहरातील सर्व सोनारांकडे याबाबत माहिती देऊन अशाप्रकारे कोणी सोन्याची तपासणी करण्यास आल्यावर पोलिसांना माहिती देण्याबाबत आवाहन केले होते. दरम्यान गेल्या आठवड्यात खेडेकर ज्वेलर्समध्ये अशा प्रकारे काहि महिला सोन्याची तपासणी करण्यासाठी आल्या असल्याची माहिती खेडेकर यांनी पोलिसांना दिली. खेडेकर आणि पोलिसांनी त्या महिलांना तुमची फसवणूक होण्याची शक्यता असून संशयित तुम्हाला व्यवहार करण्यासाठी जेव्हा बोलावतील तेव्हा आधी पोलिसांना याची माहिती देण्याबाबत सांगितले. त्यानुसार शनिवारी संशयित मारुती मंदिर येथे येणार असल्याचे त्यातील एका महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावून संशयितांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला असून आपल्या टोळीतील महिलांमार्फत महिलांना टार्गेट करुन सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फसवणूक केल्यानंतर ते आपल्या गावी जात असून प्रकरण शांत झाल्यावर 3 ते 4 महिन्यांनी पुन्हा फसवणुकीसाठी बाहेर पडत असल्याचेही त्यांनी पोलिस तपासात सांगितले.

दरम्यान अशा प्रकारची अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांनी आवाहन केले असून तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button