महाड : इतकी निष्ठूर का झाली आई? पोटच्या पोरांना विहीरीत फेकले ; चार मुलांचे मृतदेह हाती | पुढारी

महाड : इतकी निष्ठूर का झाली आई? पोटच्या पोरांना विहीरीत फेकले ; चार मुलांचे मृतदेह हाती

रायगड ; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील खरवली बोरगाव येथे एका महिलेने पोटच्या पोरांना विहीरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहीरीतून सहा मुलांचे मृतदेह मिळाल्याने नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत सहा मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले.

सहा मुलांना विहिरीत फेकले; आई मात्र बचावली

नवर्‍याशी भांडण झाले म्हणून डोक्यात राख घालून घेत एका आईने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकले आणि पाठोपाठ स्वत:देखील उडी घेतली. दुर्दैव असे की ही सर्व सहा मुले मृत्यूमुखी पडली आणि आई मात्र बचावली.

महाड तालुक्यांतील बिरवाडी जवळच्या बोरगांव येथे सोमवारी हा भयंकर प्रकार घडला. चिखुरी फौजदार साहनी (32) हा मेस्त्री काम करणारा कामगार उत्तर प्रदेश गोरखपूरचा मात्र सध्या महाड तालुक्यात वास्तव्यास आहे. त्याची पत्नी रुना साहनी हिच्याशी त्याचे सोमवारी कडाक्याचे भांडण झाले. तो तसाच कामावर गेला आणि नवर्‍याची पाठ फिरताच पत्नी रुना हिने सहा मुलांसह शेतातली विहिर गाठली. मुलांना एक एक करून तिने विहिरीत ढकलून दिले. स्वतः देखील उडी मारली. विहिरीवर सुरू असलेले हे आक्रीत आसपासच्या शेतमजूरांना समजले. पोलीसही दाखल झाले. रूना सहानीला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. ती बचावली. रोशनी (10),करिश्मा (8 ), रेश्मा (6), विद्या (5), शिवराज (3), आणि राधा (दिड वर्ष) या मुलांपैकी मात्र कुणीही वाचू शकले नाही. सध्या चिखुरी फौजदार साहनी आणि रुना साहनी दोघे नवरा-बायको महाड एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात आहेत.

हेही वाचा

Back to top button