औरंगाबाद : “किराणा दुकानात वाईन ठेवली, तर एमआयएम दुकानं फोडणार” | पुढारी

औरंगाबाद : "किराणा दुकानात वाईन ठेवली, तर एमआयएम दुकानं फोडणार"

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : “राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांचे नाव पुढे करुन किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या तयारीत आहे. तसा निर्णय देखील घेतला आहे;  परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादमधील किराणा दुकानात वाईन विक्रीस ठेवून दाखवावे. त्यांना आमचे खुले आव्हान असून एमआयएम त्यांच्यासमोर किराणा दुकाने फोडेल”, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. सोमवारी सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी जलील म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांचा खरोखरच विकास करायचा असेल तर इतरही उपक्रम राबविता येईल. दुधाची विक्री शेतमालास चांगले भाव देणे, यासह अनेक मार्ग आहेत. वाईन हा एकमेव पर्याय नाही. अगोदरच दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. होत आहेत. त्यात वाईनची बाटली तरुणाच्या हातात देऊन राज्यातील महाविकास आघाडी त्यांनी दारु पिण्याची शिकवण देऊ इच्छित आहे का? आज वाईन पिणारा तरुण उद्या बियर, रम, व्हिस्की घेणार.  तरुणांना व्यसनमुक्त ठेवण्याऐवजी हे सरकार व्यसनाधीन करण्याच्या प्रयत्नात आहे का”, असा असा सवालही त्‍यांनी केला.

“शेतकऱ्यांचे केवळ नाव पुढे केले जात आहे. मुळात या सरकारमधील किती मंत्र्यांनी वाईयनरीत गुंतवणूक केली, हे तपासावे, सर्व प्रकार समोर येईल, असा आरोपही खा. जलील यांनी यावेळी केला. भाजप, काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे आम्ही केवळ टीका करणार नाही. माझ्या औरंगाबाद मतदारसंघात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी किराणा दुकानातून वाईन विक्रीचे उद्घाटन करुन दाखवावे. त्यांच्या पुढे एमआयएम ते दुकान फोडून टाकेल.ज्या दुकानासमोर वाईनचे डिस्प्ले झळकतील, तेही फोडून टाकले जाईल”, अशा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

हे वाचलंत का? 

Back to top button