

Ajit Pawar Tweet: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर, त्यांचे 2024 मधील एक जुने ट्विट सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आहे. या ट्विटमध्ये अजित पवार यांनी विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवासाबाबत एक विधान केले होते, ते आता मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.
त्या ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले होते की, “जेव्हा आपण हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करतो आणि प्रवास सुरळीत पूर्ण होतो, तेव्हा समजते की पायलट महिला आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले होते. दोन वर्षांनंतर, विमान प्रवासादरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे हे ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे.
या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट शांभवी पाठक होते. कॅप्टन सुमित कपूर यांना सुमारे 16 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सह-पायलट शांभवी पाठक यांचा अनुभव सुमारे 1,500 तासांचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले आहे.
विमान चालवणाऱ्या VSR एव्हिएशन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. के. सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होते आणि त्याच्या देखभालीत कोणतीही त्रुटी नव्हती. “आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. ते उत्तम स्थितीत होते.''
प्राथमिक माहितीनुसार, बारामती परिसरात असलेली दाट धुके आणि कमी दृश्यमानता हे अपघाताचे प्रमुख कारण असू शकते. पायलटने रनवेवर उतरण्याचा प्रयत्न केल्यानंतर रनवे स्पष्ट दिसत नसल्याने अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दुःख व्यक्त केलं जात आहे.