

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात काल सायंकाळी धुव्वांधार पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे काळजीत असणारा शेतकरी वर्ग काहीसा समाधानी झाला असून या पावसाने शेतकर्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसाने काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नुकसान केल्याने 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती पाहायला मिळाली.
शनिवारी सकाळपासूनच रहिमपूर आणि परिसरातील जोवेॅ, कोल्हेवाडी, पिंपरणे, मनोली, कोकणगाव, शिवापूर, कोकणगाव अंधेरी वस्ती, ओझर खुर्द, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक, वडगाव पान, समनापूर, सुकेवाडी, निंबाळे आदी परिसरात वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. पाऊस, आज येईल उद्या येईल, या भरवशावर या भागातील शेतकरी वर्ग लक्ष ठेवून होता.
मात्र जोरदार पाऊस पडत नव्हता. मात्र काल सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास वरूणराजाची जोरदार बॅटिंग या परिसरात पाहायला मिळाली. तब्बल तास दीड तास सुरू असणार्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असले तरी काही शेतकर्यांचे मात्र शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले.