

जामखेड : पुढारी वृतसेवा: पहिल्याच वादळी पावसाने तालुक्यात बत्ती गुल झाली. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. वाड्या-वस्त्यांचा पिण्याचा पाणीप्रश्न विजेअभावी गंभीर बनला आहे. एकंदार महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील जवळा, नान्नज सह जवळा 33 केव्ही उपकेंद्रांतील सततच्या घोटाळ्याने दोन दिवसापासून वीज गायब आहे. याबाबत महावितरणचे अधिकारी कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी पडताच विचेचा लंपडाव सुरू झाला आहे. वादळी वारे वाहू लागतच महावितरण वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा अनुभव तालुक्यातील नागरिकांना येत आहे. जामखेड, खर्डा, जवळा परिसरात पावसाने नुकतीच हजेरी लावली. पावसाने हजेरी लावताच रात्रभर बत्ती गूल होत असल्याने नागरिक उकाड्यापासून त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या ठिसाळ व निष्क्रिय कारभारामुळेच पहिल्याच पावसात विजेची त्रेधा उडत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधारात बसावे लागत आहे. जामखेडच्या ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे फक्त कागदावरच आहेत. पावसाळ्यांत प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे लक्षात घेऊन त्यादृष्टीने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करावीत. विजेच्या खांबांवरील करड्या रंगाचे डिस्क इन्सुलेटर (चिमणी) चिनीमातीचे असतात. ते वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सुलेटर अतिशय महत्त्वाचे असतात.
उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सुलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सुलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो . त्यामुळे खराब झालेले डिस्क व पीन इन्सुलेटर बदलण्याची कामे फक्त कागदावरच होत आहेत. तांत्रिक अडचणी जाणूनही त्यावर उपाययोजना वेळीच केल्या जात नाहीत. अधिकार्यांच्या व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महावितरणला आर्थिक फटका बसत आहे. वीजपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
देखभाल दुरुस्तीची कामे फक्त कागदावरच..
महावितरणची कामे हे खासगी ठेकेदारांकडून करून घेतली जातात. कोट्यवधीचा निधी तालुक्यातील दुरुस्तीसाठी येत असताना देखील उन्हाळ्यात देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही. परंतु देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने अनेक सतत विजेचा घोटाळे होत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळेच विजेच्या लंपडाव सुरु आहे. देखभाल दुरुस्तीची कामे कागदावरच होत असल्याने सतत विजेचा लंपडाव होत आहे, याकडे मात्र अधिकार्यांचे दुर्लक्ष करत असल्यानेच ठेकेदार यांचे फावत आहेत. त्याचा फटका महावितरणबरोबर ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे महावितरण विभागीय अधिकार्यांनी हा विषय गंभीरपणे घेऊन निःपक्ष कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
खंडित वीज पुरवठा अन वाढीव वीजबिल
मसतत वीजपुरवठा खंडित होत असला, तरीही वीजबिल मात्र वाढीवच येत असते. त्यामुळे घरगुती ग्राहक, व्यावसायिक हतबल झाले आहेत. महावितरणच्या कर्मचार्यांकडून सध्या देखभाल व दुरुस्तीच्या कामे केले नसल्याचे दिसून येते. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकचांगलेच संतप्त झाले आहेत.