कर्जत : पुढारी वृत्तसेवा: कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथे भर वस्तीमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टी दारू दुकानामुळे नागरिक त्रस्त झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात नीता ज्ञानदेव बिडके यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. एवढेच न्हवे, तर कर्जत पोलिस ठाण्यातदेखील संबंधित दारूविक्रेत्याविरोधात तो त्रास देत असल्याची फिर्याद दिली आहे.
नीता बिटके या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी या ठिकाणी त्या त्यांच्या दोन मुलींच्या समवेत राहतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याकरीता शेवाया तयार करून देण्याचा व्यवसाय करतात. मात्र शेजारीच सुरू असलेला बेकायदा हातभट्टी दारू विक्रीच्या दुकानामुळे त्यांना सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिणारे लोक या ठिकाणी गोंधळ घालत असतात. याशिवाय त्यांच्याकडे शेवया बनवण्यासाठी महिला येत असतात. त्यांना देखील याचा त्रास होतो.
त्यामुळे नीता बिटके यांनी बेकायदा दारू व्यवसाय बंद करावा, अशी तक्रार दिली आहे. दि. 16 जून रोजी नीता बिटके यांचे शेवया तयार करण्याची मशीनमधून कसला तरी आवाज येऊ लागला. मशीन खराब झाली आहे, असे वाटल्याने त्यांनी त्यांचे चुलत दीर दत्तात्रेय बिटके यांना बोलावले. मात्र तक्रारीचा राग मनात धरून सासरे भागुजी बिटके, सासू ठकूबाई बिटके, दीर दादा बिटके यांनी नीता बिटके यांना शिवीगाळ केली.
त्यांनी शिवीगाळ करू नका, असे म्हणत असताना त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला तक्रार दिली असता त्यांच्या अर्जावर सासू, सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नीता बिटके यांनी त्यांच्या घराशेजारी सुरू असलेला बेकायदा हातभट्टी दारू विक्री व्यवसाय बंद करावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा