नगर : पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मात्र, अद्यापि ग्रामीण भागातील बस सुरू झाल्या नाहीत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागाने पुढाकार घेतला. त्यानुसार नगर तालुक्यातील काही गावांतील विद्यार्थ्यांसाठी 9 बसची व्यवस्था केली आहे. 23 जूनपासून महामंडळाची बस विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे. कोरोना संसर्ग आणि एसटी महामंडळ कामगारांच्या संपामुळे बससेवा जवळपास दोन वर्षे विस्कळीत झाली होती. याचा आर्थिक फटका महामंडळाला बसला.
गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. प्रवाशी वाढल्यामुळे उत्पन्न देखील वाढू लागले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, धुळेे, कल्याण, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, गाणगापूर, सुरत आदी लांब पल्ल्यांच्या बस सुरू झाल्या आहेत.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागात बससेवा सुरू नाही. बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. 13 जूनपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहे. नगर शहरात महाविद्यालये, शाळांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नगर तालुकाबरोबरच इतर तालुक्यांतील विद्यार्थी देखील नगरमध्ये शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील काही गावांत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार तारकपूर आगाराने 2019 मधील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन, तालुक्यातील काही गावे निश्चित केली. त्यानुसार 23 जूनपासून नऊ बस दोन वर्षांनंतर ग्रामीण भागातून धावणार आहेत. शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी, तसेच विद्यार्थ्यांनी या बसचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तारकपूर आगारप्रमुख अभिजित आघाव, सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर यांनी केले आहे. दरम्यान, तारकपूरप्रमाणे इतर आगारातही अशाप्रकारे बस सुरू व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.
नगर तालुक्यातील पिंपळा, आगडगाव, दैठणे, रुईछत्तीशी, गुंडेगाव, टोकेवाडी, राळेगण, सोलापूरवाडी, घोसपुरी, अकोळनेर, लोणी (सय्यदमीर) व राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावांतील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या बस धावणार आहेत. बसचे वेळापत्रक पाहून शाळांचे वेळापत्रक तयार करावे, अशी विनंती देखील महामंडळाने शैक्षणिक संस्थांना केली आहे.
हेही वाचा