संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : वैभवशाली शहराचा गाजावाजा करणार्या संगमनेर शहराची अंतर्गत वाहतुक व्यवस्था चिंताजनक बनली आहे. वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरील फेरीविक्रेते, भाजीबाजार, बेशिस्त रिक्षाचालक, टार्गट मोटारसायकल तरुण यामुळे वाहन चालवणे व पायी चालणे धोक्याचे बनले आहे. यातच बसस्थानक परिसर अनाधिकृत पार्किंगचा अड्डा बनला असून याचा त्रास व्यावसायिक व बसस्थानकाला होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाढलेली फळविक्रेत्यांची संख्या पुणे, नाशिक सारख्या महानगरांमधून 'बाद' झालेल्या रिक्षा, शहरात राजरोसपणे प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षांची भर पडली.
दोन महिन्यांपूर्वी राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वादाने शासकीय जमिनींवर बिनधास्त दुकाने थाटून मालक झालेल्या अतिक्रमणधारकांनी जोर्वे नाक्यावर चौघांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण उमटून तालुक्याचेच सामाजिक स्वास्थ धोक्यात येवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर झोपेतून उठलेल्या पालिकेने जोर्वे नाक्यावरील अतिक्रमणे भूईसपाट केली. या कारवाईच्या भितीने शहरातील अतिक्रमणधारक यांनी भंगारातून रिक्षा विकत घेवून चौकाचौकात, बेकायदा थांब्यांवर टार्गेट रिक्षाचालक सामान्यांना त्रास देत. गेले दोन महिने संगमनेर नागरिक मोकळा श्वास घेत असताना आता शहराची अवस्था पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे.
भाजी, फळे आणि वस्तू विकणार्यासह बेकायदा रिक्षा आणि त्यांचे अनधिकृत थांबे जागा अडवून उभे राहण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होऊन नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते चावडी, मेनरोड, बसस्थानकाचा परिसर, नवीन नगर रस्ता, अकोले बायपास अशा सगळ्याच भागातील काहीकाळ बंद असलेले रिक्षा थांबे पुन्हा सुरु झाली आहे. बसस्थानक, हॉटेल काश्मिर समोरील अकोले बायपास कॉर्नर आणि छत्रपती स्मारक ते चावडी या परिसरातील गचाळपणात मोठी भर पडली आहे.
पोलीस अथवा पालिका प्रशासनाकडून त्यावर कारवाई झालेल नाही. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरीही प्रचंड वाढली आहे. वाट्टेल तसे उभे राहणे, मनात येईल तेथून अचानक वळसा घेणे, एकेरी थांब्यालाही जागा नसताना. अशोक चौक व चावडी चौकात अधिकृत नसतांनाही उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा ठरलेलाच आहे. यावर कोणीतरी तोडगा काढील अशी अपेक्षा ती फोल ठरली आहे.
पालिका मुख्याधिकारी वादग्रस्त
पालिकेचे काम मुख्याधिकारी राहुल वाघ हे सध्या एकहाती कारभार पाहत आहे. ते फक्त टेंडर काढणे, बिल काढणे , ठेकेदार सांभाळणे एवढेच काम करत आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ व्यावसायिक पणा आला आहे. पालिकेत ठेकेदार, अधिकारी राज आहे. कुठलीही संघटना पक्ष कार्यकर्ते पालिकेत जात नाही याचा फायदा अधिकारी घेत आहे.
शहर पोलिसांचा धाक उरला नाही
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहराचे पो. नि. भगवान मथुरे याचा वचक राहिला नसल्याने गुन्हेगारी वाढली आहे. मटका, जुगार, कत्तलखाने, अवैध मद्य विक्री, प्रवासी वाहतूक, गुन्हेगारी, लॉज, कुंटनखाने या सारख्या ठिकाणी गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनले आहे. आर्थिक तडजोडीने याला खतपाणी घातले जात आहे. मथूरेंनी कारभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे.
हेही वाचा :