नेवासा : परिसरात सध्या सोयाबीन पिकांची सोंगणी करून मळणी यंत्रामार्फत सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, मजुरीच्या दरात झालेली वाढ, उत्पन्नातील घट अन् कमी झालेले बाजारभाव, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, यंदा सोयाबीन पिकाने त्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नेवासा तालुक्यात चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी पिकामध्ये टॅक्टर घालून नांगरट केली आहे. परतीच्या पावसामुळे काही पिकांना थोडेफार जीवदान मिळाले आहे.
संबंधित बातम्या :
त्यांनी सोंगणी व काढणीचे काम हाती घेतले आहे. मात्र, सोयाबीन पीक व त्यातील गवत पाहून यंदा सोयाबीन काढणीचा एकरी दर 4500 ते 5 हजारांपर्यंत गेला आहे. सोयाबीन पीक चांगले आले, तर एकरी सरासरी 13 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, यावर्षी सरासरी उत्पन्न एकरी 5 ते 6 क्विंटल मिळत आहे. मळणी यंत्र चालकांनी गेल्या वर्षीपेक्षा दर वाढविले आहेत. मागील वर्षी 250 रूपये पोते होते.
आता 300 रूपये दर केला आहे. हा दर देऊनही त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे एकरी उत्पादन कमी झालेले असताना काढणी व सोंगणी दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनला 4500 रूपयांच्या आतच बाजारभाव मिळत असल्याने लोकांची उधारी-उसनवारी कशी द्यावी, असा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे.
नेवासा तालुक्यात खरिपातील पिकांची वाट लागली आहे. नुकसान भरपाईनेही पाठ दाखविली आहे. केवळ पंचनाम्यासाठी धावपळ केल्याचे मध्यंतरी दिसून आले. परंतु, भरपाई व विमा रक्कम अद्याप शेतकर्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील पिके पूर्णतः गेली आहेत. तसेच, अपुर्या पावसामुळे पिकांची शाश्वती नसल्याने रब्बीच्या आशाही धुसर बनल्या आहेत. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
नुकसान भरपाई, मदत मिळेना!
खरिपातील नुकसान झालेल्या कपाशी, सोयाबीन व कांद्याचे महसूल विभागाने पंचनामे केले. काहींना मदतही मिळाली, परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ती कधी मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. तहसीलदारांनी यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे ज्ञानेश्वर दाणे या शेतकर्याने सांगितले.