‘समन्यायी’ कोपरगावात शेतकर्‍यांच्या मुळावर! स्नेहलता कोल्हे

‘समन्यायी’ कोपरगावात शेतकर्‍यांच्या मुळावर! स्नेहलता कोल्हे
Published on
Updated on

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समन्यायी पाणी वाटप कायदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. सध्या पावसाअभावी कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास कोपरगावसह नगर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, अशी आग्रही मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा अधिकार्‍यांकडे केली आहे.

सन 2005 मध्ये तत्कालीन सरकारने बनविलेला समन्यायी पाणी वाटप कायदा नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत दरवर्षी नाशिक-नगरचे पाणी मराठवाड्यासाठी जायकवाडीत सोडले जात असल्याने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. उर्ध्व गोदावरी खोर्‍यात दारणा, गंगापूर धरण समूहातील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडले जाते.

त्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रात शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळत नाही. या परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. या जाचक व अन्यायकारक कायद्याची फळे आज गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी भोगत आहेत. मतदारसंघातील शेतकरी व जनतेवर अन्याय करणारा हा कायदा विधिमंडळात संमत केला जाताना या मतदारसंघाच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या कायद्याला कशी संमती दिली, असा परखड सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला.

स्थानिक आमदार म्हणतात, मी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासास 2100 कोटींचा निधी आणला. एवढा निधी मिळाला असता तर गोदावरी खोर्‍याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असता. आमदारांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागली. कृष्णा खोर्‍यातील कामाला ज्याप्रमाणे गती दिली होती, तशी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यात वळवण्याच्या प्रकल्पास गती द्यावी, जेणेकरून नगर, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल. नगर, नाशिकविरुद्ध मराठवाडा हा पाण्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यास सर्व आमदार, लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला ऊर्ध्व गोदावरी खोर्‍यात वळवण्याच्या प्रकल्पास गती देण्यासह या प्रकल्पास केंद्र व राज्याचा जास्तीत- जास्त निधी मिळविण्याचे प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

येथील लोकप्रतिनिधी मात्र याची गांभीर्याने दखल न घेता चमकोगिरी करण्यात मग्न आहेत, हे दुर्दैव असल्याची टीका करीत कोल्हे म्हणाल्या, यामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी थांबवून दुष्काळी परिस्थितीने हवालदिल शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. खोटे बोलून, खोटी आश्वासने देऊन किती दिवस जनतेची फसवणूक करणार, जनता सूज्ञ आहे. लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना जनता आता मुळीच बळी पडणार नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली.

तत्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे आहे..!

कोपरगाव तालुक्यात पाण्याचा व विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकर्‍यांसह सर्व समाजघटक हवालदिल झाला. अशा बिकट परिस्थितीत केवळ निवेदने देऊन, नाममात्र बैठका घेऊन, कोरडी आश्वासने देऊन काहीच होणार नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, वीज, चारा व रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडवला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने तत्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशा सूचना स्नेहलता कोल्हे यांनी केल्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news