पंतप्रधान मोदींनी नव्हे; उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

सिंचन घोटाळ्याची फाईल
सिंचन घोटाळ्याची फाईल
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी 3 लाभार्थ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आस्थेवाईकपणे साधलेल्या संवादाने लाभार्थी भारावून गेले. मात्र, पंतप्रधान मोदींनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा भ्रमनिरास झाला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केंद्र सरकारच्या तेरा कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिमला (हिमाचल प्रदेश) येथून देशव्यापी संवाद साधणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी माउली सभागृहात बैठकीची व्यवस्था केली. यावेळी जिल्ह्यातील 260 लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था केली. यापैकी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पाच लाभार्थ्यांची पंतप्रधान मोदी संवाद साधणार असे निश्चित करण्यात आले. त्यासाठी राहाता तालुक्यातील पाच लाभार्थ्यांची निवड केली होती.

राज्यस्तरावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. त्यांनी अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी तीन लाभार्थ्यांशी संवाद साधला. नगर तालुक्यातील दरेवाडी येथील मीरा मधुकर कारंडे, राहाता तालुक्यातील लोणी बु. येथील विनोद भाऊसाहेब पारखे आणि राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील सुखदेव काशीनाथ उबाळे या पंतप्रधान योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

शासनाने घरकुल योजनेसह महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनेचा लाभ दिला आहे. त्यामुळे जीवनमान जगणं सुकर झालं. अशी भावना या लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली. मात्र, पंतप्रधान मोदींनी जम्मू- काश्मीर, बिहार, त्रिपुरा, कर्माटक, गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी एका लाभार्थ्यांशी संवाद साधला.

आता जिल्ह्यातील पाच लाभार्थ्यांशी संवाद साधतील, असे सभागृहातील सर्वांनाच वाटत होते. मात्र, त्यांनी तत्काळ भाषणास सुरुवात केली. त्यामुळे लाभार्थ्यांसह सभागृहातील सर्वच प्रेक्षकांची निराशा झाली. या कार्यक्रमाला महापौर रोहिणी शेंडगे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुखी संसार कर..!
विनोद पारखे यांच्याशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले, परिवार कसा आहे. मुलं किती आहेत ? त्यावर विनोद पारखे म्हणाले, एक मुलगी आहे. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ठीक आहे. सुखी संसार कर..! अशा स्नेहपूर्ण शुभेच्छा देत उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

सर्व काही दिलं, आता काही मागणं नाही
आता काही लाभ मिळणं बाकी राहिलं आहे का ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांनी मीरा कारंडे यांना विचारला. त्यावर कारंडे यांनी सांगितले की, पंतप्रधान घरकुल योजनेसह पाच ते सहा योजनांचा लाभ मिळाला आहे. शासनानं सर्व काही दिलं आहे. आता काही मागणं राहिलं नाही…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news