नगर : पुढारी वृत्तसेवा
नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 1042 जुन्या बंधार्यांच्या पुनरुज्जीवनासाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातून साठवण क्षमता वाढवून सिंचन क्षमता ही वाढणार असल्याने शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही वरदान ठरणार आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मंत्री गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्यांसाठी भेट असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचे 698 व जलसंधारण खात्याचे 344 बंधारे आहेत.
नगर तालुक्यासाठी 58 बंधार्यांसाठी 18 कोटी, नगर 100 बंधार्यांसाठी 14 कोटी, कर्जत 31 बंधार्यांसाठी 7 कोटी, कोपरगाव 49 बांधण्यासाठी 7 कोटी, जामखेड 46 बंधार्यांसाठी 7 कोटी, नेवासा 72 बंधार्यांसाठी 7 कोटी, पाथर्डी 73 बंधार्यांसाठी 9 कोटी, पारनेर 165 बंधार्यांसाठी 33 कोटी, राहाता 29 बंधार्यांसाठी 4 कोटी, राहुरी 21 बंधार्यांसाठी 2 कोटी, श्रीगोंदा 118 बंधार्यांसाठी 28 कोटी, संगमनेर 169 बंधार्यांसाठी 33 कोटी, शेवगाव 90 बंधार्यांसाठी 15 कोटी, श्रीरामपूर 21 बंधार्यांसाठी 4 कोटी असे सुमारे 200 कोटी नगर जिल्ह्यासाठी मिळणार आहेत.
सिंचन आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेतून शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करतानाच पाणीपुरवठा योजनांसाठीही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले जाते. जलसंधारण विभागामार्फत ही कामे केली जाणार असून, जलसंधारण विभागाकडे तांत्रिक मान्यता, प्रशासकिय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश देण्याबाबत पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अभियंत्यानाही सामावून घेतले आहे.
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. 2022 च्या पावसाळ्यापूर्वी संबंधित कामे पूर्ण करण्याच्या अधिकार्यांना सूचना आहेत. त्यानुसार नगरच्या कामांना डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मंजुरी मिळाली आहे. जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या 868 पैकी 698 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याची अंदाजपत्रकीय किंमत 114 कोटी रुपये असून, जलसंधारण विभागाच्या 344 कामांची प्र. मा. किंमत 69 कोटी रुपये आहे, असेही मंत्री गडाख यांनी सांगितले.