मराठा-ओबीसी नेत्यांच्या वक्तव्याने मनाला वेदना : छत्रपती संभाजीराजे
संगमनेरः पुढारी वृत्तसेवा : सध्या मराठा- ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद सुरु आहे. ते करीत असलेल्या वक्तव्यांमुळे छत्रपतींचा एक वंशज म्हणून मला मनापासून वेदना होत असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
छत्रपती संभाजी राजे एका खासगी कार्यक्रमानिमित्त संगमनेरला आले होते. प्रारंभी स्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत केले. संभाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यानंतर संगमनेर बस स्थानकावर सकल मराठी समाजाच्या वतीने 47 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपो षणास त्यांनी भेट दिली. 'एक मराठा, लाख मराठा', 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,' या घोषणांनी परिसर दणाणला. छत्रपती संभाजी राजे म्हणाले, मराठा व ओबीसी समाज हे दोघे एकमेकांचे भावंडे आहेत. एकाच छताखाली आणि एका गावात राहणारे हे लोक आहेत. त्या दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. यामुळे या दोन्ही समाजामध्ये एकमेकांविरुद्ध दरी निर्माण होत आहे.
सामान्य मराठा व सामान्य ओबीसी यांच्यात बाधा येईल, अशी वक्तव्य व शब्दरचना दोन्ही समाजाच्या नेत्यांनी करू नये, असा सल्ला देत छत्रपती संभाजी राजे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात मराठा- ओबीसी दोन समाजातून वक्तव्य येत आहेत. इंदापूर येथे धनगर समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्यादिशेने चप्पल फेकून मारली. हे काही सध्या चालले आहे, ते महाराष्ट्राच्यादृष्टीने अशोभनीय असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली. यावेळी सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची माहिती छत्रपती संभाजी राजे यांना दिली. यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा

