Siddaramaiah : लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणे गरजेचा : सिद्धरामय्या

Siddaramaiah : लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणे गरजेचा : सिद्धरामय्या

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : ब्रिटीशांच्या तावडीतून देशाला खऱ्या अर्थाने वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाने काम केले नाही. काँग्रेसमुळेच देशाची लोकशाही आणि संविधान अबाधित होते. मात्र, केंद्रात असलेले सध्याचे भाजपचे सरकार लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एक होऊन लढा देणे गरजेचे आहे. अन्यथा लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. Siddaramaiah

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती निमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते उल्हास पवार, जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे आमदार पी. एन. पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. Siddaramaiah

व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम , आ. रवींद्र धंगेकर, आ. झिशन सिद्दकी, आ. सत्यजित तांबे, लहू कानडे आ. हिरामण खोसकर, आ. शिरीष चौधरी, आ. राजेश राठोड, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, रणजीत देशमुख, इंद्रजीत थोरात, माजी आमदार मोहन जोशी, माजी आ. नामदेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संपूर्ण राज्यात जिल्ह्यात आणि संगमनेर मध्ये सहकार वाढवला. भाजप वसाहतवाद योजना  आणत आहे, ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. सहकार चळवळ ग्रामीण भागाला सशक्त बनवत आहे. मात्र, केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढू पाहत आहे. सध्या राज्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारने ताब्यात घेतले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने पाच कलमी विकास योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्याची हमी दिली. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आली आहे. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचकलमी विकास योजना जाहीर करावी आणि सत्तेवर आल्यानंतर त्या योजनांची अंमलबजावणी करावी, असा सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. एकनिष्ठता व पुरोगामी विचारांचे पाईक असणारे सर्व मान्यवर राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रस्ताविक केले. माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी स्वागत केले. नामदेव कांहडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष जयश्री थोरात यांनी आभार मानले.

 Siddaramaiah  शेतकऱ्यांच्या विविध योजनासाठी पुरस्काराची रक्कम सुपूर्द : अशोक जैन

हरित क्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने अमृतवाहिनी शेती शिक्षण व विकास संस्थेच्या वतीने जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांना एक लाख रुपये देण्यात आले. मात्र त्यांनी त्या लाख रुपयात जैन उद्योग समुहाची १० लाखांची भर टाकून ११ लाख रुपये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त करत या रकमेतून शेतकऱ्यांना विविध योजना राबविण्यासाठी खर्च करा, असे जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news