नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांंपासून गायब झालेल्या पावसाने नगर तालुक्यात दमदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या असून, जनावरांच्या चार्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
तालुक्यात 61 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके आहेत.
मात्र, जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेल्याने मूग, सोयाबीन पिके सुकली. फळबांगानाही पाणी कमी पडू लागल्याने फळबागा धोक्यात आल्या. तलाव, विहिरी आटल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला होता. त्यात जनावरांच्या चार्याचा प्रश्न मोठा होता. मात्र, गुरूवार पासून पावसाने तालुक्यात जोरदार आगमन केले. शुक्रवारी दिवसभर व शनिवारी दुपारपासून तालुक्यात जवळपास सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला.
पावसाच्या पुनरागमनामुळे तूर, बाजरी, फळबागांना संजीवनी मिळाली. त्यात काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत.तालुक्यातील जेऊर, इमामपूर, बहिरवाडी, शेंडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण,चास, कामरगाव, वाळकी, रुईछत्तीशी, साकत, दहिगाव, मठपिंप्री, खडकी, खंडाळा, जखणगाव, नेप्ती, मेहेकरी, रांजणी, माथणी परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ओढे-नाले वाहते झाले आहेत.
हेही वाचा