कर्जत : पुढारी वृत्तसेवा : उडीद पिकावर तणनाशक फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक जळाले आहे. यामुळे वयोवृद्ध शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी येथे ही घटना घडली असून, शेतकर्याने कृषी विभागाकडे तक्रार करून दाद मागितली आहे. शिंदेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत सीताराम तोरडमल यांनी त्यांच्या शेतामध्ये तीन एकर उडीद पिकाची पेरणी केली होती. पावसामुळे पिकाची उगवणही चांगली झाली होती. दीड महिन्यानंतर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तण वाढल्याने त्यांनी पारिजात कंपनीचे तणनाशक घेऊन संपूर्ण तीन एकर पिकावर फवारणी केली. मात्र, या तणनाशक फवारणीमुळे दहा दिवसांनंतर या तीन एकर क्षेत्रातील उडदाची संपूर्ण पीक जळून गेले. त्यामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यांना लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
या घटनेनंतर चंद्रकांत तोरडमल यांनी जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या संदर्भात लेखी तक्रार केली आहे. यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी यांनी यासंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालक यांना याबाबत पत्र व्यवहार केला. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये चंद्रकांत तोरडमल यांच्या उडीद पिकावर तणनाशक फवारणी केल्यामुळे पीक जळून नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तसा अहवाल देखील त्यांनी विद्यापीठाला पाठविला असून, विद्यापीठाचे संशोधक पाहणी करण्यासाठी येणार आहे.
दुकानदाराने वृद्ध शेतकर्याला धमकावले
या घटनेनंतर चंद्रकांत तोरडमल यांनी तणनाशक खरेदी केलेल्या कृषी सेवा केंद्रात जाऊन दुकानदार रोहन कालिदास तोरडमल यांच्याकडे बिलाची मागणी केली. त्यावर दुकानदाराने आमच्या दुकानातून तणनाशक घेतले नसल्याचे म्हणत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पुन्हा बिल मागायला आल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. या संदर्भात तोरडमल यांनी कर्जत पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.
हेही वाचा :