नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सुटीचा शेवटचा रविवार अन् क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याने अनेक नगरी प्रवाशांनी गर्दी कमी असेल असा विचार करून तारकपूर बस स्थानक गाठले. मात्र, पुण्याला जाण्यासाठी आले आणि एकच गर्दी झाली. सर्वच्या सर्व बसेस त्यात लालपरीनेही भाव खाल्ला. शिवशाही, शिवनेरी तसेच निमआरामही बस हाउसफुल्ल होत्या. अनेक प्रवाशांनी उभे राहून प्रवास केला, तर अनेकांनी परत घरी परत जाणे पसंद केले.
गर्दी असल्याचे पाहून खासगी वाहतुकीनेही संधीचे सोने केले. त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने सोने आणि सर्वात कमी 400 रुपये प्रति प्रवाशी भाडे घेतले. 'तुम्हाला यायचे तर या आणि दहा सीट आले की निघू , असे खासगी वाहतूक करणार्यांनी सांगितले. तर, काहींनी 600 रुपयेपर्यंत भाडे घेतले. एकीकडे महामंडळाच्या बसेस फुल्ल आणि दुसरीकडे खासगी वाहनांची लुटालूट अशी परिस्थिती दिसली.
'जादा बसेस सोडणे आवश्यक होते'
ज्यांना अत्यावश्यक अन् पुण्याला जाणे अनिवार्य होते अशाच नगरकरांनी जास्तीचे भाडे देऊन पुण्याला जाणे पसंद केले. ज्यांना इतके भाडे देणे शक्य नव्हते, त्यानी सरळ घर गाठले. प्रवाशांच्या अधिक संख्या आणि गर्दी पाहून एसटी महामंडळानेही बसेस वाढविणे गरजेचे होते. यामुळे प्रवाशाचे हाल थांबतील आणि लुटही थांबेल. एसटी महामंडळ उत्पन्न सुटीच्या काळात वाढले आहे. यामुळे त्यांनी अधिकच्या ज्यादा बसेस सोडणे आवश्यक होते, असे काही प्रवाशांनी सांगितले.
हेही वाचा :