रुईछत्तीशी : सोलापूर मार्गावरील गावे तहानलेलीच
रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील दरेवाडी, पारगाव, वाळुंज, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीशी या गावांना मुळा प्रादेशिक पाणीयोजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या नगर-सोलापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने या योजनेचा खेळखंडोबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गावांना पिण्याची पाणीटंचाई जाणवत असून, या गावात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतून गावांसाठी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. केंद्र सरकारने या योजनेसाठी 192 कोटी निधी मंजूर केला आहे, पण रस्त्याचे काम चालू असल्याने पाईपलाईन करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.
खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांनी संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम अजून वर्षभर चालणार असल्याने या गावांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याच योजनेतून पाणी दिले जाते, त्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
विहिरी, कूपनलिकांना पिण्यायोग्य पाणी नाही. मुळा प्रादेशिक पाणीयोजनेतून गेल्या 30 वर्षांपूर्वी या गावांची तहान भागवण्याचे काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केले. नगर-सोलापूर मार्गावर मोठ्या उद्योग-व्यवसायांचा विकास झपाट्याने होत असल्याने पाण्याची गरज वाढली आहे. पिण्याचा पाणीप्रश्न निर्माण झाल्याने या भागातील लोकांची पाणीटंचाई त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा
नेवासा : विश्वस्त देशमुख महाराजांची हकालपट्टी करा
Pune Dahihandi ; राज्यभरात गोविंदाचा उत्साह, अन् पुण्यात साऊंडचे स्टेज कोसळले
साहेब, थकलो हो हेलपाटे मारून..! झेडपीतील ‘सिस्टिम’ आली चव्हाट्यावर