वीरगाव : ‘आढळात’ फक्त 463 दलघफू पाणी आवक | पुढारी

वीरगाव : ‘आढळात’ फक्त 463 दलघफू पाणी आवक

वीरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पात सध्या पाणीसाठा 1 हजार दलघफूपर्यंत आला आहे. तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याची स्थिती वाटत असली तरी आढळेच्या पाणलोट व लाभक्षेत्रात दुष्काळाचे तीव्र सावट पसरले आहे. मागील वर्षी धुव्वाधार पावसाळ्यात 15 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. आत्ताचा पाणीसाठा 1000 दलघफू दिसत असला तरी यात पुर्वीचा पाणीसाठा 537 दलघफू शिल्लक होता. म्हणजे भर पावसाळा ऋतुत 100 दिवसांत अवघी 463 दलघफू पाण्याची आवक झाली. यावरुन आढळेच्या पाणलोटातील अत्यल्प पावसाचा अंदाज येतो.

आढळेवरील सांगवी (71.23 दलघफू) आणि पाडोशी (110 दलघफू) हे दोन्ही लघुप्रकल्प भरले, एवढीच काय ती समाधानाची सध्य स्थिती आहे. पावसाळ्याच्या अंतिम चरणातही नदीपात्र कोरडेठाक आहे. धरणात होणारी पाणी आवक जवळपास शुन्य आहे. पाणलोटसह लाभक्षेत्रात ओढ्यानाल्यांची पाण्याअभावी अवकळा झाली आहे. अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील 15 गावातील 3,914 हेक्टर सिंचनक्षम क्षेत्रास ही धोक्याची घंटा आहे. नदी-नाल्यातून पाणीच वाहिले नसल्याने नदीपात्रासह ओढेनाल्यांच्या कडेलादेखील गवत दिसत नसल्याने दुष्काळाचा अंदाज येत आहे.

24 तासांत केवळ 2 – 3 दलघफू पाण्याची आवक सुरु असल्याने धरण पुर्ण क्षमतेने कधी भरणार, याची चिंता लाभक्षेत्राला भेडसावत आहे. आगामी नक्षत्रात तरी पाऊस पडेल, धरण भरुन नदीपात्र वाहते होईल, अशी अपेक्षा आहे. सलग 3 वर्षे भरभरुन पावसाचे दान मिळाले. यंदा मात्र आढळेच्या लाभक्षेत्रास दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती सतावत आहे.

रब्बी येणार धोक्यात..!

पावसाचा अद्याप अंदाज नसल्याने खरीप व उभ्या पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे, असे जलसंपदाचे स. अभियंता रजनिकांत कवडे म्हणाले. आत्तापर्यंत उजव्या कालव्यातंर्गत 250 हेक्टर क्षेत्रात पाण्याची मागणी झाली. डाव्या कालव्यावर पाणी मागणी नसली तरी होणारच आहे. आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. खरीप व उभ्या पिकांना आता पाणी वापर होईल. पावसाने दगा दिला तर आता खरीपास पाणी वापर झाल्यास आढळेचा रब्बी हंगाम मात्र पुर्ण धोक्यात येईल.

हेही वाचा

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तुफान धुमश्चक्री! गोळीबारानंतर तोरखाम सीमा सील

I.N.D.I.A आघाडी आपलं नाव बदलणार! उमर अब्‍दुलांनी दिले संकेत

श्रीरामपूर : पाण्याअभावी रब्बीचे संकटही शेतकर्‍यांच्या माथी !

Back to top button