हरित नगरची निर्मिती करणार : आ. संग्राम जगताप | पुढारी

हरित नगरची निर्मिती करणार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये नियोजनबद्ध वृक्षारोपण व संवर्धन करून हरित नगरची निर्मिती करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महापालिकेच्या वतीने शहरात पाच हजार वृक्ष लागवडीची निविदा प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे. त्याचा कार्यारंभ आदेश ठेकेदाराला आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी आ. जगताप बोलत होते. उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, अनिल बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, निखील वारे, अजिंक्य बोरकर, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे, उपायुक्त अजित निकत, मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे, डॉ. धस, लेखापरीक्षक विशाल पवार, सहायक उपायुक्त सपना वसावा, उद्यान प्रमुख शशिकांत नजन आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, पर्यावरणाच्या र्‍हासामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. दिवसेंदिवस ऋतुमानात होत चाललेल्या बदलामुळे अवेळी पाऊस, ऊन, वारा, उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. ती लोकचळवळ निर्माण व्हावी, यासाठी मनपाने शहरात 5 हजार वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

यात नगरकारांनीही सहभागी व्हावे. अधिकारी, कर्मचार्‍यांनी कार्यालयात न थांबता नागरिकांमध्ये जाऊन विविध प्रश्न सोडवावेत. त्यामुळे शहर विकासाला चालना मिळेल. वृक्षारोपण व संवर्धनाची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी समिती स्थापन करून त्यात नगरसेवक व नागरिकांना सहभागी करून घ्यावे. विजेच्या तारा, गटारी व रस्त्यांचे रुंदीकरण, भविष्यकाळातील योजना आदी लक्षात घेऊनच वृक्ष लागवड करावी, जेणेकरून त्या वृक्षाची तोड होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या.

उद्यान प्रमुख शशिकांत नजन म्हणाले, शहरात 5 हजार देशी जातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. हे काम एजन्सीच्या मार्फत करून घेतले जाणार असून, प्रभाग समिती 1 ते 4 साठी प्रत्येकी 1250 प्रमाणे वृक्ष लागवड केली जाणार आहे. ठेकेदारास खत मनपा पुरविणार आहे. ठेकेदार 2 वर्षे वृक्षांची देखभाल करणार आहे. 10 ते 12 फूट उंचीच्या वृक्षाची लागवड केली जाणार असून, त्याभोवती ट्री गार्ड बसविले जाणार आहेत.

या वृक्षांची करणार लागवड

अरणी, अर्जुन, आसाना, उडी, उंबर, ऐन, कदंब. करंज, काचन, काटे पांगारा, सावर, किन्हई, खडशिंगी, गगनजाई, जांभूळ, देवबाभूळ, धाईटी, पायर, प्लक्ष, बकुल, बहावा, बच पांगारा, बेहडा, भोकर, मुचकुंद, रतनगुंज, श्रीथाल, श्रीदम, सोनचाफा, हिरडा.

हेही वाचा

विधानसभेच्या 51, तर लोकसभेच्या 11 जागा हव्या : जोगेंद्र कवाडे

अहमदनगर : बिबट्याचा सहा महिन्यांपासून मुक्तसंचार

नाशिक : हरवलेला मुलगा घोटी पोलिसांनी तासाभरात शोधला

Back to top button