राशीन नळयोजनेच्या पाण्याची चोरी
खेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : खेड (ता.कर्जत) येथील भीमा नदीवरून राशीनसाठी नव्याने राबविण्यात आलेल्या 13 कोटींच्या पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीलाच अडीच इंची पाईपची जोडणी करून एका हॉटेल व्यावसायीकाने हॉटेल व शेती फुलविण्यासाठी केलेल्या पाणी चोरीमुळे खळबळ उडाली आहे. जालिंदर लक्ष्मण नरसाळे (रा.चौकीचा लिंब, करपडी) असे या पाणीचोरी केलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राशीन-भिगवण रस्त्यावर करपडी फाट्याच्या पुढे चौकीच्या लिंबासमोर हॉटेलचालक जालिंदर लक्ष्मण नरसाळे याने राशीनच्या मुख्य पाणी योजनेला अडीच इंची पाईप जोडून शेती आणि हॉटेलसाठी पाणी चोरी केली. पाच महिन्यांपासून प्रतिदिनी अडीच लाख लिटर चोरी होत असून, या पाण्याची किम्मत सव्वा सात लाख रुपये एवढी होत असल्याचे ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा नदी पाण्याने भरली असताना आणि कोट्यवधी रुपये खर्च करून पाईपलाईनने राशीनकरांची तहान भागत नव्हती. तब्बल आठ आठ दिवस राशीनकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. चोरीमुळे पाण्याचा दाब कमी झाल्याने हजारो नागरिकांचा घसा पाण्याविना कोरडा राहिला.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित