आघाडी सरकारचे नेतृत्वच मोठा कलंक होता : पालकमंत्री राधाकृष्ण विखे | पुढारी

आघाडी सरकारचे नेतृत्वच मोठा कलंक होता : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

आश्वी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्षे तुम्ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व हाच महाराष्ट्राला सर्वात मोठा कलंक होता, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात अभियानाचा शुभारंभ मंत्री विखे पा. यांच्या उपस्थितीत आश्वी बु. करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, बापूसाहेब गुळवे, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, विजयराव चतुरे, कैलासराव तांबे,रोहिणी निघुते, कांचन मांढरे, अशोकराव म्हसे, भगवानराव इलग, विनायकराव बालोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. यांनी महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरीकांना पत्रक वाटून घरोघरी जावून दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पा. यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. सत्ता आणि पद गेल्याचे वैफल्य कसे असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. राजकारणात टीका केली जाते, परंतू टीका करण्याची पातळी उध्दव ठाकरे यांनी सोडल्याची टीका करुन, ते म्हणाले, स्वत:च्या वडीलांच्या विचारांनाही तुम्ही कलंक लावला.

विचारांची तडजोड करुन, सत्ता स्थापन केली. आपल्या सत्तेच्या काळातच औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली गेली. महाराष्ट्राला तो कलंक तुमच्यामुळेचं लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस नेत्यांकडून होत होता. तेव्हाही तुम्ही त्यांच्या मांडीला- मांडी लावून बसला. क्रांतीकारकांच्या विचारांना तुम्ही कलंकीत केल्याचा आरोप मंत्री विखे पा. यांनी केला.

कोविड काळात मुंबई महापालिकेतील घोटाळे आता बाहेर येत आहेत. हा कलंक तुम्ही कसा विसरता, असा थेट सवाल मंत्री विखे पा. यांनी देशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तिसर्‍या आघाडीचा होत असलेला प्रयोग कधी यशस्वी होणार नाही. आघाड्यांचे प्रयोग कसे असतात, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. विरोधकांच्या वज्रमुठीला तडे जाणार, हे मी यापुर्वीच सांगितले होते. आता मुठही शिल्लक राहिली नाही. केवळ व्यक्तिव्देशापोटी मोदीजींवर टीका करण्याचे काम सुरु आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टीका करतात, परंतू त्यांना निवडणुकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचे संख्याबळही या पक्षाकडे आता राहीलेले नाही, परंतू या विरोधकांना जनतेच्या मनात कोणतेही स्थान नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 9 वर्षात केलेली कामगिरी ही संपूर्ण जगासमोर असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

अजित पवारांच्या माध्यमातून तिसरे इंजिन जोडले
केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून तिसरेही इंजिन जोडल्याने हे सरकार वेगान पुढे जात आहे. गतीमान निर्णयांची अंमलबजावणी होत असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

हे ही वाचा :

Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या, भाजप आमदाराकडून SC मध्ये कॅव्हेट दाखल

निवडणुकीच्या तयारीला लागा : राहुल गांधी

Back to top button