रुईछत्तीशी परिसरात दोन दिवस पाऊस; बाजरी, मका, कापूस पिकांवर शेतकर्यांची मदार
रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मृग नक्षत्र कोरडा गेला. मुगाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकर्यांचे खरीप पीक वाया जाते की काय, अशी अवस्था होती. परंतु, रुईछत्तीशी परिसरात गेल्या दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर शेतकर्यांना पाऊस कधी पडल याची चिंता लागली होती. परंतु, मानसून महाराष्ट्रात दाखल होण्यास उशीर झाल्याने परिसरात जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. पावसाने हा प्रश्न मिटला नसला तरी शेतकर्यांना आता पुढच्या पावसाची अपेक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे आता चांगला पाऊस पडून खरिपाची पिके पेरली जाणार आहेत. मका, बाजरी, कापूस पिकांवर शेतकर्यांची मदार आहे. दोन ते तीन दिवसात शेतीतील मशागतीची कामे सुरू होतील. रुईछत्तीशी परिसरात दूध व्यवसाय मोठ्या आहे. शेतीची मशागत करून जनावरांचा चारा शेतकरी घेणार आहेत.
पाऊस जरी कमी झाला, तरी पुढच्या पावसाच्या अपक्षेने शेतकर्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मका, कापूस व बाजरी पिकांची पेरणी करण्यावर शेतकर्यांचा भर असणार आहे. मागील वर्षी ही मृग नक्षत्र कोरडे गेले; परंतु त्यानंतर मकाची खूप मोठी पेरणी झाली अन् शेतकर्यांना उत्पन्न मिळाले होते. यांनतर समाधान कारक झालेल्या पावसावर मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली होती. माळरानावर गवत उगवून जनावरांच्या चार्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने दूध उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.
हेही वाचा
मांजरांचे 1869 जणांना चावे ; पुणे पालिकेकडून तीन हजार मांजरींचे निर्बीजीकरण