नगर: प्रशासन आता ‘दिव्यांगांच्या दारी’ : जिल्हाधिकारी सालीमठ; दिव्यांग व्यक्तींचे गावनिहाय होणार सर्वेक्षण
नगर, पुढारी वृत्तसेवा: दिव्यांगांच्या विविध अडचणीची सोडवणूक होण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आता ‘दिव्यांगांच्या दारी’ जाणार आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करा. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांचे गावनिहाय सर्वेक्षण विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यात जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गुरवले, जिल्हा दिव्यांग निर्मूलन केंद्राचे समन्वयक दीपक अनाप उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींबरोबरच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत, यासाठी जिल्हास्तरीय शिबीराच्या आयोजनाचे सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वय साधत काटेकार नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे गाव, वाडीनिहाय सर्वेक्षण विहीत वेळेत करावेत. कामांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य यंत्रणा तसेच आयसीडीएस यांचा सहभाग घेण्यात यावा, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.
हेही वाचा:
नगर: केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध, अॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम
मेगाभरती! अहमदनगर महापालिकेत दोन महिन्यांत भरणार 134 जागा
नगर: शीतपेयातून चिमुकल्यासह चौघांना विषबाधा, कर्जत तालुक्यातील प्रकार; घरी आलेल्या व्यक्तीबद्दल संशय