संगमनेर: कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला व्यापाऱ्याची मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

संगमनेर: कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला व्यापाऱ्याची मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी आलेल्या रणखांबच्या शेतकऱ्यास व्यापाऱ्याने मारहाण केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा ते एक तास बाजार समितीचे गेट बंद आंदोलन केले. अखेर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात पुन्हा दाखल केल्या नंतर सदरचे गेट बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हा आपल्या शेतातील टोमॅटो घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयुब सय्यद या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी घेऊन आला. त्या ठिकाणी किरण बारवे यांची पिक-अप गाडी आणि आयुब पठाण यांची सुद्धा गाडी उभी होती. त्यावेळी तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे शेतकरी किरण बारवे म्हटल्याचा आयुब पठाणला राग आला. त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या शेतकऱ्यास शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण याने किरण यांची गच्ची पकडून लथा बुक्यांनी मारहाण केली. आमच्या नादी लागू नको, तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच युवासेनेचे तालुका प्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार, महिला तालुकाप्रमुख शितल हासे, पप्पू कानकाटे, साहेबराव हासे, रणजीत ढेरंगे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्नबाजार समितीच्या गेटजवळ जमा झाले. सुमारे अर्धा ते एक तास गेट बंद आंदोलन केले. जो पर्यंत शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तसेच गेट बंद आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.

या आंदोलनाची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आणि संगमनेर शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. त्या नंतर आंदोलनकर्त्यांनी गेट बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत किरण बारवे यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयुब पठाण व अरबल पठाण या दोघांच्या विरोधात मारहाण करणे, दमदाटी करणे आणि शिवीगाळ करणे या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button